सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळयाचे उद्या शनिवारी साताऱ्यात येत आहे .जिल्ह्याच्या सीमेवर पाडेगाव येथे स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे. पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात दुपारी नीरा नदी ओलांडून पाडेगाव (ता खंडाळा) येथे प्रवेश करणार आहे. पालखी सोहळा प्रवेश केल्यानंतर प्रथमता माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या दत्त घाटावर स्नान घालण्यात येते. त्यासाठी वीर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. पाडेगाव ते लोणंद पालखी रथाच्या मार्गावर आकर्षक रांगोळी, विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

पालखी तळावर पुरेसा उजेड, मदत व नियंत्रण कक्ष,सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षेसाठी सुरक्षा मनोरे उभारण्यात आले आहेत. सुलभ दर्शनरांगासाठी बॅरिकेट करण्यात आले आहेत . दर्शन रांगांमध्ये भाविकांना पिण्याचे पाण्याची व उन्हापासुन रक्षण होण्यासाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासनाच्या विविध विभागांच्या वतीने अत्यंत चांगल्या प्रकारे काम करण्यात येत असून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

आणखी वाचा-विश्वविजेत्या टीम इंडियासाठी मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; ‘एवढ्या’ कोटींचं बक्षीस जाहीर

दिंड्या उतरणाऱ्या ठिकाणी तीनशे तात्पुरत्या शौचालयाची बाथरूमची व्यवस्था करण्यात आली आहे. दिंड्यांना व वारकऱ्यांच्या उपयोगासाठी तात्पुरत्या वीज जोडणीची व्यवस्था करण्यात आली आहे .आपत्कालीन परिस्थितीसाठी ॲम्बुलन्स तसेच कार्डियाक ॲम्बुलन्स ठेवण्यात येणार आहेत. पालखीतळावर २४ तास सुसज्ज आरोग्य कक्ष उभारण्यात आला आहे खाजगी रुग्णालयांना खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी नमुने प्रयोगशाळांमध्ये तपासले आहेत.

विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील सातारा जिल्ह्यातील लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड येथील पालखी तळाची पाहणी केली. वारकऱ्यांना मुक्कामांच्या ठिकाणी आवश्यक सुविधा देण्यासोबत निर्मलवारीसाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. हरितवारीसाठी लावलेल्या वृक्षांचे योग्यप्रकारे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आणखी वाचा-जेष्ठ साहित्यिका शोभा डे यांनाही अलिबागची भुरळ, खरेदी केला ८ कोटी ३० लाखांचा आलिशान बंगला

माऊलींच्या पालखी सोहळ्यात सातारा पोलिसांचा डिजिटल बंदोबस्त करण्यात आला आहे. भक्ती सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.पाच दिवस या पालखी सोहळ्यामध्ये कोणत्याही विघ्न संतोषी प्रवृत्तींचा वारकऱ्यांना उपद्रव होऊ नये याकरिता सातारा पोलिसांनी हायटेक पावले उचलली आहेत. या पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तासाठी ८२ अधिकारी आणि साडेआठशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत याचा आढावा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेतला.