पंढरपूर : आषाढी यात्रेमध्ये लाखो भाविकांना दर्शनासाठी गेली २० दिवस २४ तास उभे असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शिणवटा काढण्यात आला. आषाढी यात्रेनंतर प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. विठुरायाला गरम पाणी व दह्यादुधानं स्नान घालण्यात आलं आणि आयुर्वेदिक काढाही देण्यात आला. यानंतर देवाचे नित्योपचार पूर्ववत सुरु करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढी यात्रेत लाखो भक्तांना दर्शन देण्यासाठी विठुराया अहोरात्र उभा होता. यात्रा कालावधीत सलग २० दिवस मंदिरात २४ तास दर्शन सुरू असते. या काळात विठ्ठलाला थकवा येऊ नये म्हणून पाठीला लोड लावण्यात आला होता. याकाळात देवाचे सर्व नित्योपचार बंद होते. ते आज पूर्ववत करण्यात आले. अखंड उभे राहून दमलेल्या देवाचा शिणवटा काढण्यासाठी कित्येक वर्षांपासून ही प्रक्षाळ पूजा परंपरा सुरू आहे. यासाठी आज दुपारपर्यंत दर्शनाला येणारे भाविक लिंबू आणि साखर देवाच्या पायाला चोळून दर्शन घेत होते. यामुळे थकलेल्या पायाच्या शिरा मोकळ्या होतात अशी भावना भाविकांची आहे.

हेही वाचा – Balasaheb Thackeray : २७ हजार हिऱ्यांनी मढवलेलं बाळासाहेबांचं पोर्ट्रेट पाहिलंत का?, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचं खास गिफ्ट

यानंतर ब्रह्मवृंदाच्या रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. त्यानंतर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराला उत्साह प्राप्त होत असल्याची भावना वारकरी संप्रदायात आहे. यानंतर देवाला सुंदर पोशाख परिधान करण्यात आला. मस्तकी सुवर्ण मुकुट, गळ्यात अनमोल कौस्तुभ मणी, दंडाला दंड पेट्या आणि गळ्यात अत्यंत मौल्यवान मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, तीन पदरी सुवर्ण तुळस माळ, मारवाडी पेठ्यांचे हार, अशा विविध अलंकाराने नटलेल्या विठुरायाचे सौंदर्य अतिशय खुलून दिसत होते.

हेही वाचा – Raj Thackeray : “राज ठाकरेंना भावापेक्षा सुपाऱ्या अधिक लाडक्या”, उबाठा गटाचा टोला; म्हणाले, “भाजपाच्या हातचं बाहुलं बनून…”

रुक्मिणी मातेलाही वाक्या, तोडे, तानवड, मोहरा आणि पुतळ्यांच्या माळा, हायकोल, चिंचपेटी व पुतळ्याची माळ असे पारंपारिक दागिन्यांनी सजविण्यात आले होते. देवाचा शिणवटा घालवण्यासाठी रात्री गवती चहासह विविध प्रकारचे १५ ते १६ आयुर्वेदिक पदार्थांचा काढा झोपण्यापूर्वी दिला जातो. या काढ्यामुळे देवाला पूर्ण विश्रांती मिळून चांगली झोप लागते असे मानतात. दरम्यान या पूजेनंतर देवाचे नित्योपचार पुन्हा सुरु झाले आहेत. असे असले तरी प्रक्षाळ पूजेआधी आणि नंतर सगळे विधी पार पडत असताना देवाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत जातात आणि आलेला शिणवटा जाऊन पुन्हा चेहरा प्रसन्न दिसू लागतो, अशी भावना वारकऱ्यांची आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur vitthala prakshal puja completed undo the routine ssb
Show comments