चिपळूण शहराला कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दणका दिला व प्रचंड वित्तहानी केली. आता मुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचा असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला आहे.
आज पहाटे हा प्रकार घडला असून पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे. याठिकाणी उपस्थित असलेल्यांच्या म्हणण्याप्रमाणे गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल ब्रिटिशकालीन होता नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती. आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला, परंतु आज पहाटेच्या सुमाराला या पुलाचा काही भाग वाहून गेला त्यामुळे पुलाला भगदाड पडल्यासारखे दृश्य दिसत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील हा पूल महत्त्वाचा पूल असल्याने, या पुलाच्या दुरूस्तीला आता किती काळ लागेल? हे महत्वाचे आहे. सध्या तरी या मार्गावरील वाहतूक पुन्हा ठप्प होणार असल्याचे दिसत आहे.