सातारा: करोना काळात मृत रुग्ण जिवंत दाखवून २०० रुग्णांवर उपचार करून कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करणारी याचिका आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ५ जुलैला सुनावणी होणार आहे. मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणात गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे, अरुण गोरे, राकेश मेहता, महेश बोराटे, प्रवीण औताडे, डॉ. अनिल बोराटे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. सागर खाडे आणि इतरांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. करोना काळात २०० मृत रुग्णांना जिवंत दाखवून भ्रष्टाचार केल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. त्याबाबतची सुनावणी ५ जुलैला उच्च न्यायालयात हाेणार आहे.

हेही वाचा : ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

राजकीय हेतूने आरोप

करोना प्रादुर्भावात आम्ही मायणी, म्हसवड आणि दहिवडी या तीन ठिकाणी उपचार केले. करोना रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आमच्याकडे रुग्ण आल्यानंतर त्यांच्यावर हे उपचार करण्यात आले. आम्ही साडेतीन हजार रुग्णांवर उपचार केले असताना प्रत्यक्षात आम्हाला फक्त ५८४ रुग्णांचे एक कोटी ६४ लाख रुपये मिळाले. तसेच एखादा रुग्ण उपचारादरम्यान दगावला असेल तर त्याच्यावर झालेला खर्च मागणेही चुकीचे नाही. यामुळे माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे राजकीय हेतूने आहेत.

जयकुमार गोरे आमदार, माण-खटाव