PM Narendra Modi at Jalgaon: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यात लखपती दीदींचा मेळावा संपन्न झाला. बचत गटाच्या माध्यमातून अर्थाजन करणाऱ्या महिला या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. बचत गटाना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून तीन कोटी लखपती दीदी तयार करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच मागच्या दोनच महिन्यात ११ लाख लखपती दीदी तयार झाल्या असून महाराष्ट्रात ही संख्या एक लाख असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेपाळ दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदींनी नेपाळ बस दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली व्यक्त केली. “या अपघातात जळगावच्या अनेक भाविकांनी आपला जीव गमावला आहे. मी पीडित कुटुंबीयांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. अपघात झाल्यानंतर आम्ही नेपाळ सरकारशी संवाद साधला. राज्यमंत्री रक्षा खडसे यांना नेपाळमध्ये पाठवले. जे मृत झाले, त्यांना हवाई दलाच्या विमानाने महाराष्ट्रात परत आणले आहे. जे जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल”, असे त्यांनी सांगितले.

लखपतीदीदींसाठी ६४०० कोटींची घोषणा

“माझ्या सर्व लाडक्या बहिणी आज मोठ्या संख्येने लखपती दीदींच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. देशभरातील लाखो बचत गटांशी जोडल्या गेलेल्या माझ्या बहि‍णींना ६४०० कोटींचा निधी मिळाला आहे. महाराष्ट्रातीलही लाखो बहि‍णींना यामाध्यमातून कोट्यवधीचा निधी मिळणार आहे”, अशी घोषणा मोदी यांनी केली.

कोल्हापूरच्या छत्रपतींच्या कार्याचा गौरव

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, मी नुकताच विदेश दौऱ्यावरून आलो. पोलंड येथे गेलो असताना मला महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले. पोलंडचे लोक महाराष्ट्राच्या लोकांचा आदर करतात. पोलंडमध्ये कोल्हापूर मेमोरियल आहे. कोल्हापूरच्या लोकांनी केलेली सेवा आणि योगदानाबाबत सन्मान व्यक्त करण्यासाठी हे स्मारक उभारले आहे.

हे वाचा >> Germany invades Poland: पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरमध्ये स्थलांतर का केले? नेमके काय घडले होते?

महाराष्ट्रातील महिलांचा गौरव व्यक्त करताना ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांना दिशा आणि मार्गदर्शन करण्याचे काम माता जिजाऊंनी केले. महिलांना जेव्हा सन्मान मिळत नव्हता, तेव्हा सावित्रीमाई फुले पुढे आल्या. भारताच्या मातृशक्तीने समाज आणि राष्ट्रनिर्मितीमध्ये मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये मी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाईंची छाप पाहतो.

“लोकसभेला महाराष्ट्रात आलो तेव्हा बोललो होतो की, आम्हाला तीन कोटी बहि‍णींना लखपती दीदी बनवायचे आहे. बचत गटात काम करणाऱ्या महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाखाहून अधिक असेल. मागच्या दहा वर्षात एक कोटी लखपती दीदी बनल्या आणि मागच्या केवळ दोन महिन्यात ११ लाख आणखी लखपती दीदी यात जोडल्या गेल्या. यात एक लाख लखपती दीदी महाराष्ट्रात तयार झाल्या आहेत. यात महायुती सरकारचे मोठे योगदान आहे. लखपती दीदी हे अभियान केवळ माता-भगिनींना लखपती बनविण्याचे अभियान नाही. तर संपूर्ण कुटुंबाला आणि त्यांच्या आगामी पिढीला आर्थिक सक्षम करण्याचे एक महाअभियान आहे. या उपक्रमामुळे गावाचे अर्थचक्रही बदलत आहे”, असे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi interacts with lakhpati didis in maharashtra jalgaon district mentioned his polland visit kvg