प्रिय ना.धों. महानोर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही असं निघून जाणं काळालाच काय निसर्गावर प्रेम करणाऱ्या कुणालाच पसंत पडलेलं नाही. तुम्ही जोंधळ्याला चांदणं चिकटवणारे कवी होतात. एका शेतकऱ्यालाच ही कल्पना सुचू शकते. आज तुमचं जाणं हे आम्हाला नुसतं चटका लावून जाणारं नाही तर कवितेला निसर्ग हरवून गेलाय ही भावना निर्माण करणारं आहे. प्रेमा-बिमात पडायचं वय असतं त्या काळात तुमची निसर्ग कविता हाती आली. ‘अबोली’साठी लिहिलेलं तुमचं गाणं ‘तुझ्या वाटेला ओले डोळे, सुकून गेले पानमळे’ हे तर आजही मनात अनेकदा रुंजी घालत असतं. पु. ल. देशपांडे यांनी जसं महाराष्ट्राला हसायला शिकवलं तसं तुम्ही आम्हाला निसर्ग शिकवलात.

‘जैत रे जैत’ मधली तुमची गाणी विसरता येणं तर केवळ अशक्य. ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘आम्ही ठाकर ठाकर..’, ‘नभ उतरु आलं.. अंग झिम्माड झालं..’, ‘मी रात टाकली…’, ‘गोऱ्या देहावरती कांती..’ एकाहून एक सरस आणि सर्वांगसुंदर गाणी. तुमची लेखणी, हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि जब्बार पटेलांचं दिग्दर्शन यामुळे तो सिनेमा अजरामर झाला. निसर्गाशी तुम्ही इतके बांधले गेला होतात की तुम्हाला बिरुद लागलं ते रानकवी हेच! मूळचे शेतकरी असलेले तुम्ही.. बरड जमीनही फुलवलीत.. आणि मातीतून पिकाचे धुमारे फुटावेत तसंच तुमच्या कवितेचंही स्वरुप होतं.

‘आंब्याच्या झाडाला मोहोराचा वास झेपता झेपेना, गाभुळ्या चिंचेला नवतीचा भर पोटी धरवेना’ या तुमच्या ओळी तुमच्या कविता निसर्गाशी आणि मातीशी किती जोडल्या गेल्या होत्या त्याचीच साक्ष पटवतात. तुम्ही गद्यलेखनही केलंत पण निसर्गभान शिकवणारी कविताच तुमची ओळख झाली आहे. अरुणा ढेरे यांनीही तुमच्या कवितेच्या बाबत असं म्हटलं होतं की, “तुमच्या कवितेतून अस्सल, संपन्न आणि तरल संवेदनशीलता यांचा प्रत्यय येतो.”

शेती हे तुमचं पहिलं प्रेम होतं हे तुम्ही वारंवार बोलूनही दाखवलं आहे. ‘या शेताने लळा लावला असा की, सुख दुःखाला परस्परांशी हसलो रडलो.. आता तर जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो..’ या तुमच्या ओळी तुमचं शेतीवरचं निस्सीम प्रेम दाखवून जातात.

तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदारही झालात.. पण शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीत करता येऊ शकणारे प्रयोग, शेतकऱ्यांच्या समस्या या सगळ्यावर तुम्ही जी संवेदनशील भाषणं केलीत ती आजही अनेक नेत्यांच्या स्मरणात आहेत. तुमच्याविषयी शरद पवार यांनी व्यक्त केलेली श्रद्धांजली तुमचा स्वभाव किती मृदू होता ते दाखवणारी आहे. “ना. धो. खूपच हळवे , त्यात पत्नीच्या निधनाने ते आणखी खचले. मी , प्रतिभा त्यांच्या खचलेल्या मनाला उभारी देत राहिलो. पण अखेर हा वृक्ष उन्मळून पडला. ना. धो. चे निधन देखील पावसाळ्याच्या दिवसांत व्हावा हा योग मनाला चटका लावून जाणारा आहे.” शरद पवारांनी हे तुमच्याविषयी लिहिलं आहे, त्यांनी तुम्हाला दिलेली वृक्षाची उपमा अगदीच योग्य आहे.

तुम्ही आज देहरुपाने निघून गेला आहात.. कवितेचं आनंद देणारं एक झाड कायमचं हिरावलं गेल्याची भावना आम्हा सगळ्यांच्याच मनात आहे. तुम्ही शब्दरुपाने मागे आहात आणि राहाल यात कुणाच्याही मनात शंका नाही..

तुमचाच एक चाहता..