मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं, असं विधान काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“मला राज्य सहकारी बँकेबद्दल काही कडक निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावं लागलं. त्याची राजकीय किंमत मला भोगावी लागली. २०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसने माझं सरकार पाडलं. सरकार पडलं नसतं आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवली असती. तसेच, २०१४ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आले असतं. भाजपाचं सरकार आलेच नसते,” असं मत पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य, म्हणाले, ‘लोकसभेत भाजप जिंकल्यास विधानसभा निवडणुका होणार नाहीत…’

“मराठा आरक्षणाचा प्रश्नही मी सोडावला असता. कारण, ५० वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच मराठा आरक्षणासाठी मी निर्णय घेतला होता. सरकार राहिलं नसल्यानं मराठा आरक्षणही न्यायालयात टिकलं नाही. अन्यथा मराठा आरक्षण टिकवलं असतं,” असंही पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं.

“पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे आमदार”

“२०१४ साली राष्ट्रवादीनं सरकार पाडलं, असं त्यांचं मत आहे. तर, आज राष्ट्रवादीबरोबर त्यांनी युती का केली आहे? त्यांनी युती करायला हवी नव्हती. तसेच, पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचे आमदार म्हणून निवडून आले आहेत,” असा टोला प्रफुल्ल पटेलांनी चव्हाणांना लगावला आहे.

“हल्ली चव्हाणांना विनोद का सुचतो, कळत नाही”

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानावर खासदार सुनील तटकरेंनी भाष्य केलं आहे. “पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत, असा माझा समज होता. पण, हल्ली त्यांना विनोद का सुचतो आहे, ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असं म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही,” असं सुनील तटकरेंनी म्हटलं.

हेही वाचा : “मोदींनी मान्यता दिली नसती, तर घोडेबाजार झाला नसता”, चव्हाणांच्या वक्तव्यावर शिंदे गटातील मंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पृथ्वीराज चव्हाणांमुळे राष्ट्रवादी चौथ्या क्रमाकांवर”

“पृथ्वीराज चव्हाणांना सुपारी देऊनच पाठवलं होतं. जर, आम्ही निवडणुका एकत्र लढवणार नव्हतो, तर सरकारमध्ये राहण्यात अर्थ नव्हता. चव्हाणांच्या काळातच आघाडीची लय बिघडली. आघाडी सरकारमध्ये विलासराव देशमुख हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज चव्हाणांमुळेच काँग्रेस चौथ्या क्रमांकावर गेली,” अशी टीकाही सुनील तटकरेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prafull patel reply prithviraj chavan over ncp fall my govt 2014 ssa
Show comments