Former Maharashtra CM Ashok Chavan Resigned from Congress: काँग्रेसचे राज्यातील वरीष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा एकीकडे रंगत असताना दुसरीकडे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अगदी काल-परवापर्यंत सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या अशोक चव्हाणांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे हा पेच आता पक्षश्रेष्ठी कसा सोडवणार? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“लोकांना हे सगळं पटत नाहीये”

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय स्थिती जनतेला पटत नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. “मी महाराष्ट्रात जिथे जिथे गेलो, तिथे लोकांची मानसिकता समोर आली आहे. महाराष्ट्रात कधीही एवढे वाद नव्हते. स्थिर सरकार असायचं. निकालाच्या दिवशी बोंबाबोंब व्हायची. पण अंतिम निकाल मान्य व्हायचा आणि पाच वर्षं सरकार चालायचं. मात्र आता पक्ष फोडणं, गोळीबार करणं, धमकावणं हे फार मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे. हे मराठी माणसाच्या मानसिकतेला झेपणारं नाही. तो त्याच्याशी सहमत नाही. त्यामुळे मराठी माणूस निवडणुकीची वाट पाहात आहे हे दिसतंय”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निकालाचा भाजपाला फायदा नाही?

दरम्यान, येत्या १५ तारखेला राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय निकाल देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यावर प्रकाश आंबेडकरांनी भूमिका स्पष्ट केली आहे. “१५ तारखेला राहुल नार्वेकर राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय निकाल देणार? याची सध्या चर्चा आहे. भाजपाला वाटत असेल की या निकालामुळे ते अधिक सुरक्षित होतील. पण मला परिस्थिती कठीण दिसते आहे”, असं आंबेडकर म्हणाले.

अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला किती फटका?

अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला किती नुकसान होईल? अशी विचारणा केली असता प्रकाश आंबेडकरांनी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असं म्हटलं आहे. “या पक्षप्रवेशामुळे इतर पक्षांना धक्का वगैरे बसेल असं वाटत नाही. कोणताही मोठा नेता पक्षातून गेल्यामुळे पक्षाला त्रास तर होतो. पण पक्ष म्हणून व्यापक परिणाम होत नाही. त्यामुळे एखाद-दुसऱ्या नेत्यानं जाणं धक्कादायक आहे, पण त्यामुळे पक्षावर व्यापक परिणाम होतो असं मी मानत नाही”, असं आंबेडकर म्हणाले.

मोठी बातमी! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, भाजपात जाणार?

“भाजपाला जे हवंय ते होईल असं मला वाटत नाही. कारण आता मतविभागणीवर परिणाम होईल असं दिसतंय. लोकांनी कुणाला मत द्यायचं याबाबतचा त्यांचा निर्णय जवळपास निश्चित केलाय असं दिसतंय”, असंही आंबेडकरांनी नमूद केलं.

“नरेंद्र मोदी रिंगमास्टर”

केंद्रीय तपास यंत्रणांचा दाखला देत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘रिंगमास्टर’ची उपमा दिली. “नरेंद्र मोदी रिंगमास्टर आहेत. जेवढ्या लोकांची चौकशी चालू आहे, त्यांना हा रिंगमास्टर नाचवणार आहे. मग ते काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांपासून सामान्य नेत्यांपर्यंत सगळे आहेत. काल देशभरात ४५० ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्या राजकीय नाहीयेत. अराजकीय आहेत. या धाडी टाकण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांची ४०० हून अधिक जागा मिळतील ही घोषणा भीतीपोटी आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar on ashok chavan resigns congress party to join bjp pmw
Show comments