Prakash Ambedkar Maharashtra Election 2024 : सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणात काही जातींना वेगळे आरक्षण देण्यासाठी वर्गीकरण करता येईल, असा निकाल दिला. या निकालाच्या विरोधात देशभरातल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संघटनांनी एकत्र येत २१ ऑगस्ट रोजी ‘भारत बंद’चे आंदोलन पुकारले होते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाला संविधानाच्या नवव्या परिशिष्टात टाकावे, जेणेकरून भविष्यात पुन्हा कधीही त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी मागणीही त्या भारत बंद आंदोलनाद्वारे करण्यात आली होती. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देखील केंद्र सरकारच्या धोरणास विरोध दर्शवला आहे. आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “केंद्राच्या या धोरणाला आपण निवडणुकीतून विरोध केला पाहिजे. याला आपण निवडणुकीचा मुद्दा बनवलं पाहिजे”. तसेच आंबेडकरांनी सर्व सनदी व शासकीय अधिकाऱ्यांना याविरोधात एकत्र येण्याचं व निवडणुकीतील मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलं आहे. प्रकाश आंबेडकरांनी अधिकाऱ्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी स्वतःचे ५० हजार रुपये खर्च करा आणि मतदान आपल्या बाजूला वळवा.

हे ही वाचा >> Jyoti Mete : ‘शिवसंग्राम’च्या ज्योती मेटे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; विधानसभा लढवणार?

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की सुप्रीम कोर्टाने एससी, एसटी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअर हा निर्णय लागू करण्यासाठी एका निवृत न्यायाधीशाची नेमणूक केली आहे. बार्टीच्या एका अधिकाऱ्याला सचिव म्हणून नेमण्यात आले आहे, त्यांचा अहवाल हा सादर केला जाईल अहवाल एकदा सादर झाला की सुप्रीम कोर्टाचा उपवर्गीकरण आणि क्रिमी लेअरचा निर्णय लागू होईल.

हे ही वाचा >> Sreejaya Chavan श्रीजया चव्हाण भाजपाकडून लढवणार निवडणूक, वडील अशोक चव्हाण म्हणाले, “आता तिला…”

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

वंचितचे प्रमुख म्हणाले, हा निर्णय लागू झाला तर एससी एसटी त्या अधिकाऱ्यांच्या मुलाला मुलीला आणि कुटुंबाला आरक्षण मिळणार नाही. हे त्यांनी समजून घ्यावे आरक्षण वाचवणे हा निवडणुकीचा मुद्दा आपण केला पाहिजे, म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्वतःचे ५० हजार रुपये खर्च केले पाहिजेत. निवडणुकीत प्रचार करण्यासाठी किंवा मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी कशा पद्धतीने वळवायचं याची आपल्याला अधिक जाणीव आहे. उद्याचे आमदार निवडून आले तर हा निर्णय अंमलबजावणी करण्यापासून थांबवता येतो. म्हणून तमाम फुले शाहू आंबेडकवादी विचाराच्या अधिकाऱ्यांना आवाहन करतोय की आपण या निवडणुकीमध्ये आपल्या पदरचे पन्नास हजार रुपये खर्च करून आपल्या मुलाबाळांचं आरक्षण वाचवा असे आवाहन मी करत आहे. वंचित बहुजन आघाडीला मतदान देऊन हे आरक्षण आपण वाचवाल ही अपेक्षा.