राज्य सरकारने नुकताच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सुरू केली असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. या योजनेनुसार जुलै महिन्यापासून राज्यातील महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये मानधन दिले जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेच्या अंमलबजावणीवर विरोधकांकडून टीकादेखील करण्यात येत आहे. अशातच आता मुस्लीम समाजातील ज्या व्यक्तीला दोन पत्नी आहेत अशा कुटुंबाला आणि दोनपेक्षा जास्त अपत्य आहेत, अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतील नियम बदलले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली घोषणा

काय म्हणाले प्रकाश महाजन?

प्रकाश महाजन यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य केलं. “मुस्लीम समाजात ज्या पुरुषाला दोन पत्नी आहेत किंवा ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत, असा महिलांना या योजनेचा लाभ देऊ नये”, असे ते म्हणाले. “या देशात लवकरच लोकसंख्येचा स्फोट होणार असून वाढत्या लोकसंख्येचा भार, जे लोक दोनपेक्षा जास्त अपत्य होऊ देत नाहीत, त्यांच्यावर पडतो, त्यांच्या कराचा पैसा दुसरीकडे खर्च होतो, अशा महिलांना या योजनेचा लाभ दिल्यास, खरे गरजू मागे राहतील”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली

राहुल गांधींवरही केली टीका

पुढे बोलताना त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. “राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते नेते झाले आहेत. त्यामुळे आता ते अनिर्बंध बोलू शकतात. मुळात त्यांचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही. जे मुलं हिंदू आई-वडिलांच्या पोटी जन्माला येतात, ते खरे हिंदू असतात”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय

सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना काय?

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली होती. या योजनेनुसार, प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बैंक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल, असं अजित पवार यांनी सांगितलं होतं.