सिंधुदुर्गात पावसाअभावी शेतकरी नागली पिकाकडे वळले आहेत. या पावसात नाचणी, भुईमूग, चवळी, उडीद, कुळीथसारखी नागली पिके भरडी जमिनीवर घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले. अजूनही चार तालुक्यांत पावसाची पाठ पाहिली जात आहे. यंदाचा कृषी हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक बनला आहे. या हंगामात ६० टक्केच पाऊस कोसळला आहे. जूनमध्ये चांगला ८५ टक्के, जुलैमध्ये ५८ ते ६० टक्के चिंताजनक पाऊस झाला आहे. ऑगस्टमध्ये १०० टक्के पाऊस झाला तरच शेतीचे वेळापत्रक सावरेल असा अंदाज आहे, अन्यथा करपा रोगासह कीडीचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. जिल्ह्य़ात ६८ हजार हेक्टर जमिनीवर भार रोपे लावण्याचे उद्दिष्ट होते. कृषी विभागाच्या अहवालानुसार ६० हजार ६०५ हेक्टरवर भात लावणी पूर्ण झाली आहे. पाऊस उत्तम झाला तर तीन हजार हेक्टरवर आणखी भात रोपे लावणीचे उद्दिष्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. भात रव पेरणीसाठी सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले व कुडाळ तालुक्यात शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. येत्या ५ ऑगस्टपर्यंत पाऊस झाला तर भरडी जमिनीचे आणखी दोन हजार हेक्टर क्षेत्रात रव पेरणी होईल तसेच आणखी एक हजार हेक्टरवर भात रोपे लावणी होईल. तसेच झाल्यास ६१ हजार २०० हजार हेक्टर क्षेत्राची लावणी पूर्ण पूर्ण होईल. त्यामुळे ६३ हजार हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे सांगण्यात आले. पावसाच्या लंपडावामुळे शेतकऱ्यांनी भातशेतीपासून काही क्षेत्र दूर ठेवत १८०० हेक्टर क्षेत्रात नाचणी, २०० हेक्टर क्षेत्रात भुईमूग, ४१३ हेक्टर क्षेत्रात कुळीथ, उडीद, मूग अशा कडधान्याचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. पावसावर शेतकऱ्यांच्या हंगामातील कष्टाचे फळ अवलंबून आहे असे कृषी विभागाने स्पष्ट केले. भातपीक कापणी प्रयोगाचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. जिल्ह्य़ात ९० गावात अर्धा गुंठा जमिनीत पीक स्पर्धा घेण्यात येते. त्यावर लोकसंख्या, उत्पादनाचे धोरण ठरविले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गेल्या २४ तासात सरासरी ४६.३८ मि.मी. म्हणजेच ३७१ मि.मी. पाऊस झाला. यंदाच्या हंगामात हा पाऊस १०९५९ मि.मी. एकूण नोंदला आहे. जिल्ह्य़ात आठही तालुक्यात आज कोसळलेल्या पावसासह कंसातील १ जून ते १ ऑगस्टचा पाऊस आहे. दोडामार्ग ४१ मि.मी.(१५३६ मिमी), सावंतवाडी ३२ मि.मी.(१६४३ मिमी), वेंगुर्ले १७ मि.मी.(१०२५ मिमी), कुडाळ ५५ मि.मी.(१२६० मिमी), कणकवली ८० मि.मी.(१७४० मिमी), मालवण ३४ मि.मी.(११०३ मिमी), देवगड ३३ मि.मी.(१०९० मिमी), वैभववाडी ७९ मि.मी.(१५५१ मिमी) मिळून ३७१ मिमी (१०९५९ मिमी) एवढा पाऊस कोसळला. या हंगामात पावसाचे वेळापत्रक कोलमडले असले तरी शेतकऱ्यांनी नागली पीक घेण्यासाठी दाखविलेली तयारी महत्त्वाची मानली जाते. भरडी शेती अडचणीत आली असून पावसाअभावी शेतकरी चिंतेत आहे.

Story img Loader