सावंतवाडी : शेतकरी व फळ बागायतदारांनी आज आंदोलन छेडत प्रांताधिकारी कार्यालयासमोर शक्ती प्रदर्शन केले. काजू अनुदानाबाबत जाचक अटी शिथिल करून वाटप येत्या मंगळवारपर्यंत करण्यात आले नाही तर बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर आमरण उपोषण, रास्ता रोको सारखे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काजू बी ला प्रतिकीलो २०० रुपये हमीभाव मिळावा आणि काजू अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी जाचक अटी रद्द करा अशा मागण्या घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकरी व फळ बागायतदारांनी आज शुक्रवारी सकाळपासून प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडले असता एक अट शिथिल करून समाईक जमीनीमधील लाभार्थीचे हमीपत्र घेण्याचा निर्णय मंत्री दिपक केसरकर यांच्या पुढाकाराने झाल्याचे पत्र तहसीलदार श्रीधर पाटील यांनी उपोषण स्थळी आणले. यावेळी उपोषणकर्त्यानी येत्या मंगळवारपर्यंत जाचक अटी रद्द झाल्या नाहीत तर बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>Rohit Pawar : “गृहमंत्री धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन…”; पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून रोहित पवारांचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र!

 मंत्री दिपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन समाईक जमीनीमधील लाभार्थीचे हमीपत्र लिहून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यास पणनमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला तो निर्णय तहसीलदार श्रीधर पाटील यांनी वाचून दाखविला. तेव्हा फळबागारतदार शेतकऱ्यांनी जीएसटी अट रद्द झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली.

यावेळी आंदोलनकर्ते विलास सावंत, वसंत उर्फ अण्णा केसरकर, सुरेश गावडे, अन्य शेतकऱ्यांनी निर्णय घेण्यासाठी शासनाला वेळ दिला. येत्या मंगळवारपर्यंत काजू अनुदान अटी शिथिल करून वाटप करण्याचा निर्णय घेतला जावा, अन्यथा बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर आमरण उपोषण, रास्ता रोको सारखे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>>Pankaja Munde : “हर्षवर्धन पाटील यांनी भाजपा पक्ष सोडायला नको होता, पण…”; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

शासनाने काजू अनुदानापोटी २७९ कोटी रुपये काजु उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी घालण्यात आलेल्या जाचक अटी शर्ती रद्द करून विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे , काजू बी ला प्रतिकीलो २०० रूपये हमीभाव मिळावा, विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, वन्य प्राणी नुकसान करत आहेत ती भरपाई आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावे, काजू आयात शुल्क २० टक्के करावे, एखादं झाड तोडले तर ५० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे त्या शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला,अशा विविध विषयांवर आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी सावंतवाडी – दोडामार्ग फळबायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, माजी आमदार राजन तेली, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत, प्रवीण परब,माजी सरपंच सुरेश गावडे, अभिमन्यू लोंढे यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी ज्वलंत समस्या व विचार मांडले.