मराठवाडय़ावर पावसाची कृपा; मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात वृष्टी
राज्यातील दुष्काळी स्थितीत मोठय़ा व दमदार पावसाची अपेक्षा असताना राज्याच्या काही भागांत मंगळवारी वादळी पावसाच्या सरींनी हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील तीन-चार दिवस अशाच सरी पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
ऐन पावसाळ्यात पावसाने तब्बल दोन महिने ओढ दिल्यामुळे राज्यात दुष्काळाचे संकट आहे. धरणांमध्येही अपुरा पाणीसाठा आहे. अशा स्थितीत सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या काही भागांत वादळी पावसाच्या सरी पडत आहेत. मंगळवारीसुद्धा मध्य महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्य़ांमध्ये अनेक ठिकाणी दुपारनंतर वादळी सरींनी हजेरी लावली. पुणे शहरातही जवळजवळ दीड महिन्यांनंतर जोरदार सरी बरसल्या. याचप्रमाणे कोकणात रत्नागिरी व इतर काही ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात नागपूरच्या परिसरात मोठा पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या संपूर्ण आठवडय़ात काही भागात अशाच प्रकारे वादळी पाऊस अपेक्षित आहे.
तीव्र दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या उस्मानाबाद, लातूर या जिल्हय़ांसह मराठवाडय़ात बहुतांश ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. परतीच्या पावसाने जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्हय़ांतही काही महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला. १२ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा