Raj Thackeray on Sharad Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, कार्यकर्ता मेळाव्यांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पण्यांना उत आलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून राज ठाकरेंनी राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली आहे. गोरेगाव येथे नेस्कोत आज त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध घटनांवर भाष्य करत शरद पवार यांच्यावरही टीका केली.

निवडणुकीसाठा जागा वाटपाची चर्चा सुरू असताना प्रत्येकवेळी विचारावं लागतंय की हा नेता आता कुठे आहे. निष्ठा वगैरे नावाची गोष्ट आहे की नाही? आणि महाराष्ट्रातील जनता यांना भरभरून मतदान करते. हे यांचे राहिले नाहीत, तुमचे काय राहणार. अशी अवस्था महाराष्ट्राची करून ठेवली”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “बाबा सिद्दीकींच्या घराची दीड महिना रेकी, कार्यालयाबाहेर पाळत अन्…”, हत्येच्या कटाविषयी संशयित आरोपींनी पोलिसांना काय सांगितलं?

ते पुढे म्हणाले, “कालचा दसरा मेळावा पाहिला. उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत. सारखे वाघनखे काढतात, इथून अफजल आला, शाहिस्तेखान आला. अरे महाराष्ट्राबद्दल बोल. तिकडे पुष्पाचं वेगळंच चालू आहे. एकनाथ शिंदे, मै आयेलाय असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करून दाखवली. मी असा महाराष्ट्र कधीच पाहिला नाही. कोण निवडून आला, कोणाला मतदान केलं, सध्या ते काय करतात अशा पद्धतीने महाराष्ट्रात मी पाहिलंच नाही. मला कळेच ना काय सुरूय?”

“शरद पवार सांगत आहेत की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? १९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली, त्यानंतर नारायण राणेंना फोडलं, तुम्ही कसल्या फोडाफोडीच्या गोष्टी बोलताय? आणि मी आता अजित पवारांबद्दल बोलतच होतो. आता गुलाबी जॅकेट घालून फिरतात. कोणी सांगितलं माहिती नाही. भाजपा यांना स्वीकारतो तरी कसा? अजित पवार भाजपात यायच्या ८ दिवस अगोदर मोदी म्हणाले होते की ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाकू. पण जेलमध्ये टाकण्याएवजी त्यांना मंत्रिमंडळात टाकलं. हे का होतंय?”असा प्रश्नही राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेा विचारला.

शरद पवार नास्तिक आहेत

“मी ठाण्यातील सभेत म्हटलं होतं की शरद पवार नास्तिक आहेत. देवधर्म काही पाळत नाहीत. आजपर्यंत पाळला नाही. त्यांच्या मुलीने लोकसभेतच सांगितलं आहे, की माझेवडील नास्तिक आहेत म्हणून. मी हे सर्व बाहेर बोलल्यानंतर पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जाऊन पाया पडायला लागलेत. पण हे हात जोडणंदेखील खोटं आहे.”

…तर महाराष्ट्र बरबाद होत जाणार

सरळ सभ्य प्रामाणिक नेता महाराष्ट्राला का आवडत नाही? गद्दारी करणारा प्रत्येकजण तुम्हाला का आवडतो? आमदार फोडाफोडी करायचे, राजकारण तापवायचं. एका पक्षाबरोबर निवडणूक लढवायची, विचारांची प्रतारणा करून दुसऱ्याबरोबर सत्तेत बसायचं, हेच आपण पाच वर्षे पाहतोय. सरळ विचार करणारा, सभ्य विचार करणारा, प्रगतीचा विचार करणारा माणूस हवा की फोडाफोडीचं राजकारण करणारी असली माणसं पाहिजेत? आज जर महाराष्ट्रातील जनतेने योग्य निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा. नको त्या विषयांची घाण पसरत जाणार महाराष्ट्रात”, असंही राज ठाकरे म्हणाले.