Raj Thackeray in Worli Vision : वरळी विधानसभा मतदारसंघात म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झंझावाती भाषण केलं. टाऊन प्लानिंगपासून पुतळ्याच्या राजकरणापर्यंत राज ठाकरेंनी सडेतोड भाषण केलं. तसंच, राजकारण्यांसह बिल्डरलॉबीपासूनही सावध व्हा असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. वरळीत आज मनसेकडून वरळी व्हिजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, तिथे ते बोलत होते.

“मला ही बीडीडी चाळ समोर दिसली की मला माझं बालपण आठवतं. वडिलांबरोबर मी येथे येत असे. कोणत्या इमारतीत राहायचे हे आठवत नाही, पण आमचे डॉक्टर या बीडीडी चाळीत राहायचे”, अशी आठवण राज ठाकरेंनी आज सांगितली.

ते पुढे म्हणाले, “गेले अनेक महिने बीडीडी चाळीतले लोक येतात, पोलीस बांधव, पोलीस भगिनी येतात, कोळीवाड्यातील बांधव भगिनी येतात. आज काही जाहीर सभा नाही, यामुळे लांबट भाषण करणार नाही. तुम्ही या महाराष्ट्राचे मालक आहात, तुम्ही या मुंबईचे मालक असून का रडताय? बाहेरच्या राज्यातून लोक येतात, झोपडपट्ट्या वसवतात आणि फुटकात सर्व घेऊन जातात. याचं कारण योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही. ऐरवी पाच वर्षे भांड भांड भांडणार आणि ऐन मोक्याच्या वेळी घरंगळत जाणार. आणि त्यांनाही माहितेय की तुम्ही जाऊन जाऊन जाणार कुठे? त्यामुळे तुमचे प्रकल्प रखडत राहणार आणि जे बाहेरून येतात ज्यावेळी त्यांची टगेगिरी सुरू होते, त्यांच्या म्हणण्यांनुसार गोष्टी त्यांना मिळतात, हातात येतात त्यांच्या”, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> “आम्ही तीन पिढ्या वीजबिल भरलं नाही, हजार रुपये इंजिनिअरला देतो अन्…”, शिंदे गटाच्या खासदाराचं विधान चर्चेत

“वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वीस बावीस वर्षांपूर्वी तिकडच्या झोपडपट्टी धारकांना ऑफर होती, एकतर घर मिळेल किंवा एक कोटी रुपये मिळतील. वीस वर्षांपूर्वी एक कोटी रुपये. आणि आमच्याकडे काय चाललंय, आम्हाला एवढं स्क्वेअर फूट वाढवून द्या”, अशी टीकाही त्यांनी केली. “तुम्हाला स्वाभिमानाने उभं राहायचं असेल, तर स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या. म्हणजे जे येतात आणि जातात ते होणार नाही. डेव्हलोपमेंट प्लान होतोय, पण टाऊन प्लानिंग होत नाही”, असंही ते म्हणाले.

“तुमची स्वतःची हक्काची जमीन विकासकाला देत असताना तुम्ही प्रश्न विचारत नाहीत, आणि हेच त्या लोकांना हवं असतं. बिल्डरसारख्या अवलादींना हेच हवं असतं. त्यावर राजकारणी बसलेलेच आहेत बसलेले. तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे”, असा सल्लाही त्यांनी दिला.

“राज्य आणि राष्ट्र उभं करायंच असतं तेव्हा २००-३०० वर्षांचा विचार करायचा असतो. प्रत्येक शहरांचं कॅरेक्टर असतं, लंडनला गेलात तर तिथली एक टॅक्सी असते. पण आपल्या एकाही शहराला कॅरेक्टर उरलं नाही. या शहराची ओळख नाही. फ्लायओव्हर्स ही आपली ओळख. पण हे कशासाठी होतंय?” असा प्रश्नही त्यांनी विचारला.

ठाण्यात सर्वाधिक परप्रांतियांची संख्या

“मुंबईची लोकसंख्या किती, त्यातून बाहेरून येणाऱ्यांची संख्या किती, मग रस्ते केले पाहिजे, इमारती, फ्लायओव्हर्स वाढले पाहिजेत. वाढत जाणाऱ्या लोकसंख्येत इथल्या लोकांचा हात नाहीय, बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे लोकसंख्या वाढतेय. मग त्यांना सुविधा देण्यात आमचा खर्च करतोय, मग आमचा पैसा इथे खर्च होऊन आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. जिथे पैसा खर्च व्हायला पाहिजे तिथे होत नाही. ठाणे जिल्ह्यात एका जगाच्या पाठीवर असा जिल्हा मिळणार नाही, या देशात तर नाहीच नाही, लोकसंख्या वाढत जाते तशी ग्रामपंचायत, नगरपालिका वगैरे होत जाते. मुंबईत एक महानगर पालिका, पुण्यात दोन आहेत. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यात आठ महानगरपालिका आहेत. ठाणे जिल्ह्यातील लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही, जनगणना पाहिली तर बाहेरील राज्यातील सर्वांधिक लोकसंख्या ठाण्यात आहे. मग कुठून आणणार आहात सुविधा? इथला माणूस सुखी झाला तर बाहेरून माणूस आला तर आम्ही सांभाळून घेऊ”, असंही राज ठाकरे म्हणाले.