Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava 2025 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण आज मुंबईतल्या शिवतीर्थावर होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशीचा मनसेचा मेळावा हा कायमच चर्चेत असतो. आज राज ठाकरे काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये हिंदुत्व, पक्षाची पुढची भूमिका, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल, मनसेची पुढची भूमिका हे सगळे विषय आहेत. त्यामुळे या विषयांवर राज ठाकरे बोलणार यात तर शंकाच नाही. तसंच महापुरुषांचा अवमान प्रकरण, मराठी आणि इतर भाषिक वाद याबाबतही राज ठाकरे भाष्य करु शकतात.
मनसेने गुढीपाडवा मेळाव्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता बाळासाहेबांच्या फोटोशिवाय कुणाला पुढे जाताच येत नाही असं म्हणत राज ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेलाही राज ठाकरे उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Raj Thackeray MNS Gudi Padwa Speech Live Updates, 30 March 2025
मुंबईत मराठीच बोललं पाहिजे नाही बोललात तर कानफटीतच बसणार -राज ठाकरे
मराठी माणसाला विळखा पडतो आहे. मुंबईत आम्हाला सांगता की मराठी बोलणार नाही, मराठी बोलला नाहीत तर कानफटीतच बसणार. आम्हाला फाल्तू देश वगैरे काही सांगायचा नाही. महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत, प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते आहे की नाही तपासा असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केली आहे. या देशातला हिंदू तेव्हाच येतो जेव्हा मुस्लिम रस्त्यावर येतात. दंगल संपली की तो मराठी, पंजाबी, गुजराती, पंजाबी सगळा होतो. मराठी झाला की साळी, माळी, कुणबी, ब्राह्मण असा होतो. आपल्या जातीबाबत प्रेम चांगलं, दुसऱ्या जातीबाबत विद्वेष असणं विकृती आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी माणसाचं हित पाहणार असाल तर फडणवीसांना आमचा पाठिंबा-राज ठाकरे
देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे. तुमच्या हाती चांगलं राज्य आलेलं आहे. मराठी माणसाचं हित पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, रोजगार यांचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे. टोरस कंपनी इथे आली लुटून गेली. जी असुरक्षितता आली आहे, वैचारिक असुरक्षितता आली आहे. मंदिरांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. बुवा वगैरे लोकांच्या मागे रांगा लागल्या आहेत.
लाडकी बहीण योजना बंद होणार-राज ठाकरे
लाडकी बहीण योजना यामध्ये २१०० रुपये देणार म्हणे. तसं केल्यास ६३ हजार कोटींचं कर्ज होईल. साडेतीन ते चार लाख कोटींचं कर्ज होईल. हे पैसे वाटू शकत नाहीत. त्यामुळे ही योजना बंद होणार. रोजगाराचे प्रश्न आहेत, आस्थापना येत आहेत त्यात बाहेरच्या लोकांना भरलं जातं आहे. कारण आम्ही इथल्या मुलांना जातींमध्ये गुंतवलं आहे. व्हॉट्स मध्ये गुंतवलं आहेत. हे सगळे उद्योग सुरु आहेत. मूळ प्रश्नांकडे आहे कुणाचं लक्ष? शेतकरी कर्जमाफी होणार नाही हे काल अजित पवार बोलले आहेत. असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. तसंच तुम्ही मराठी म्हणून एकत्र उभं राहिलं पाहिजे.
संतोष देशमुख प्रकरणात पसरवलं काय गेलं? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं-राज ठाकरे
रोजगाराचे विषय, कामगारांचे विषय, शेतकऱ्यांचे विषय हे सगळे विषय बाजूला टाकत आहोत. संतोष देशमुख यांना किती घाणेरड्या पद्धतीने मारलं. तुमच्या नसानसांत इतकी क्रूरता असेल तर मी दाखवेन जागा. हे सगळं झालं कशातून विंड मिल, तिथली राख. मी आजवर ऐकलं होतं राखेतून फिनिक्स भरारी घेतो. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होतो. संतोष देशमुखांनी या सगळ्याला विरोध केला. कारण विषय होता खंडणीचा. खंडणींचा विरोध करणाऱ्यांचा. आम्ही लेबलं काय लावली? वंजाऱ्याने मराठ्याला मारलं. यात जातींचा काय संबंध? राजकीय पक्ष तुम्हाला सातत्याने जातीपातीत गुंतवत आहेत. शेतकऱ्यांच्या दिवसाला सात आत्महत्या होत आहेत, रोजगार निर्मिती होत नाहीत, मराठवाडा सोडून तरुण-तरुणी पुण्यात येतात. या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे सगळं चाललं आहे असाही आरोप राज ठाकरेंनी केला. आहे.
औरंगजेबाच्या कबरीची सजावट काढून टाका आणि त्याला मराठ्यांनी गाडलंय हा फलक लावा-राज ठाकरे
औरंगजेबाने संभाजी राजांना क्रूर पद्धतीने मारलं. औरंगजेबाशी राजाराम महाराज, ताराराणी साहेब, संताजी आणि धनाजी यांनीही लढा दिला. औरंगजेबाला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता पण तो त्याला जमला नाही. जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो, त्याचा अभ्यास केला जातो. त्याचा अभ्यास केला जातो तेव्हा लोकांना कळतं छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य. जी कबर आहे ना तिथली सजावट काढून टाका आणि तिथे मोठा फलक लावा, मराठ्यांना म्हणजे आम्हाला हरवायला आलेला औरंगजेब हा इथे गाडला गेला. अफझल खान प्रतापगडावर आला होता. त्याला पायथ्याशीच पुरला. पुरुन उरेन हा शब्द करुनच तिथूनच आला. त्याची कबर महाराजांना विचारल्याशिवाय बांधली गेली? शक्यच नाही. ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं नेस्तनाबूत करुन चालणार नाही. जगाला दाखवलं पाहिजे आम्ही यांना गाडलं आहे. असंही राज ठाकरे म्हणाले.
चित्रपट पाहून जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाहीत-राज ठाकरे
आपल्याला जंगलं, पाणी किंवा इतर विषयांपेक्षा महत्त्वाचं काय? औरंगजेबाची कबर हटवायची, आत्ता कुठून आला हा विषय? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाही. चित्रपट उतरला की हे उतरले. विकी कौशल मेल्यावर आणि अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळला का? व्हॉट्स अॅपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील. औरंगजेबावर कुणीही बोलत आहेत. विधानसभेत बोलत आहेत. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला आहे. त्याच्याबद्दल माहिती आहे का? इतिहासातून डोकं फिरवायला आहेच. ब्राह्मणांनी औरंगजेबाला साथ दिली वगैरे सांगितलं जातं, मराठ्यांनी साथ दिली. हे सगळं माथी भडकवण्यासाठी केलं जातं आहे. कसला इतिहास सांगतो आहोत ? इतिहासांच्या पानात गेलात ना तर अपेक्षांची भांडी ठळाठळ फुटतील. असंही राज ठाकरे म्हणाले.
पंतप्रधा नरेंद्र मोदींना जंगलं, वन्य प्राणी आवडत असतील तर ते वाचवण्यासाठी ते काय करत आहेत?-राज ठाकरे
आमचे पंतप्रधान जंगलात फिरायला गेले होते. आता वनतारा का फनतारामध्ये गेले होते. मोदींना जंगलांची आणि प्राण्यांची आवड असेल तर जंगलं जगवली पाहिजेत. आपल्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे ते पवई ते घोडबंदर इतकं आहे. इतकं मोठं नॅशनल पार्क जगाच्या शहराच्या मध्यवर्ती भागात कुठेही नाही. ते जगवण्याठी काय करत आहोत? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे.
मी कुंभमेळ्याचा अपमान केला नाही-राज ठाकरे
ज्या मतदारांनी मनसेला मतदान करुनही इलेट्रॉक्निक मशीनमध्ये ज्यांची मतं दिसली नाहीत त्यांचेही मी आभार मानतो असं राज ठाकरे म्हणाले, जे झालं ते झालं. आता यापुढे काय? ते बघायचं आहे. निवडणुका झाल्यावर अनेक विषय झाले, बोलले गेले. सदिच्छा आणि शुभेच्छांचे अनेक फोन मला आले. आजच अनेक फोन आले. ते आज का आले? मला माहीत आहे. जरा जपून वगैरे.. मला वाटतं जे काही घडलं ते तुम्हाला सांगणं आवश्यक आहे गरजेचं आहे. असंही राज ठाकरे म्हणाले. कुंभमेळा हा पहिला विषय. मी त्या दिवशी म्हणालो तसं बाळा नांदगावकरांनी पाणी आणलं, मी सांगितलं पिणार नाही. मग नव्याने वारं शिरलेल्या हिंदुत्ववाद्यांना वाटलं मी कुंभमेळ्याचा अपमान केला. मूर्ख आहात का? नयन कदमही तिकडे जाऊन आले. आतमध्ये गेल्यावर अहह झालं. म्हटलं खालून एखादं प्रेत गेलं असेल एखादं. आपल्या देशातल्या नद्यांची भीषण अवस्था आहे. नदीला आपण माता म्हणतो, देवी म्हणतो. त्याकडे अनेक वर्षांपासून राज्यकर्ते दुर्लक्ष झालं आहे. गंगा साफ झाली पाहिजे असं राजीव गांधी म्हणाले होते. त्यांनी गंगा साफ करण्याचं काम हाती घेतलं. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यांनीही तेच सांगितलं. नद्यांची अवस्था अशी आहे की पाणी पिणं लांबची बाब राहिली. अंघोळ केल्यावर लाखो लोक आजारी पडले आहेत. हे मला उत्तर प्रदेशातल्या लोकांनीच सांगितलं. गंगेवरची काय परिस्थिती आहे? कुंभमेळ्याच्या अपमानाचा प्रश्न नाही. प्रश्न पाण्याचा आहे.
थोड्याच वेळात राज ठाकरेंची सभा
राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्यांची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकासंदर्भात काही बोलणार का?
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत सभा आहे. थोड्याच वेळात ही सभा सुरु होणार आहे. या सभेत राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात राज ठाकरेंची भूमिका काय असेल? याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंची तोफ थोड्याच वेळात धडाडणार
गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज सभा आहे. थोड्याच वेळात ही सभा सुरु होणार आहे. या सभेत राज ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांना महत्वाचं मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. या बरोबरच राज्यातील विविध विषयांवर देखील ते भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष (फोटो-ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाइन)
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या टिझरमध्ये हिंदुत्व, पक्षाची पुढची भूमिका, औरंगजेबाची कबर, महाराष्ट्रातील राजकारणाचा चिखल, मनसेची पुढची भूमिका हे सगळे विषय आहेत. त्यामुळे या विषयांवर राज ठाकरे बोलणार यात तर शंकाच नाही. तसंच महापुरुषांचा अवमान प्रकरण, मराठी आणि इतर भाषिक वाद याबाबतही राज ठाकरे भाष्य करु शकतात.