Raj Thackeray On Yashashree Shinde Murder Case : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (३ ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या निवासी बंगल्यावर भेट घेतली. या भेटीत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसंच, यशश्री शिंदेचे हत्याप्रकरणही या चर्चेत आले. याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.

२५ जुलै यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. विवाहाला नकार दिला म्हणून दाऊद शेख या तरुणाने तिची गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह तिथंच ठेवून तो पसार झाला. तिच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले. दोन दिवसांनी तिचा मृतदेह पोलिसांना सापडला. ही घटना उजेडात येताच महाराष्ट्रभर खळबळ माजली. या घटनेचा तपास फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी खुद्द तिच्या आई-वडिलांनीही केली आहे. आता मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या भेटीतही या हत्या प्रकरणाची चर्चा झाली आहे. (Raj Thackeray On Yashashree Shinde Murder Case)

हेही वाचा >> Yashashree Shinde Murder Case : “यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू, एकावर दाऊदचं नाव, दुसऱ्या..” पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

उरण येथील यशश्री शिंदे हिचं झालेलं निर्घृण हत्याकांड, तसंच शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे हिच्या झालेल्या हत्याकांडाबद्दल मनसे नेते अविनाश अभ्यंकर आणि आमदार राजू पाटील यांनी चिंता व्यक्त करत आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच शक्ती कायदा जरी राज्यातील दोन्ही सभागृहाने मान्य करून त्याचा मसुदा केंद्राकडे पाठवला असला तरी त्यातील काही तरतुदींवर केंद्राचे आक्षेप आहेत, त्यामुळे या कायद्याला केंद्राकडून मंजुरी मिळत नाहीये, यावर राज्य शासनाने केंद्रसरकारकडे पाठपुरावा करावा अशी आग्रही मागणी अविनाश अभ्यंकर यांनी केली. (Raj Thackeray On Yashashree Shinde Murder Case)

अजून कोणत्या विषयावर झाली चर्चा?

मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नावर आणि त्यात लालबाग-परळ-शिवडी परिसरातील फेरीवाले साखळी उपोषणाला बसले आहेत त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत अशी भूमिका पक्षाचे नेते श्री. बाळा नांदगावकर यांनी मांडली, ज्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले गेले.

हेही वाचा >> Yashashree Shinde : प्रिय यशश्री, …तर तू वाचली असतीस गं!

पुण्यातील पुरात जीव गमावलेल्या दोन मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांच्या मदतीचा धनादेश आणि त्यापैकी एका मृताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी मिळवून देण्याचे निर्देश प्रशासनाला द्यायला लावले.

पोलीस दिवसरात्र आपले रक्षण करतात पण मुंबईतल्या पोलिसांना राहण्यासाठी घरे नाहीत. ही लाजिरवाणी बाब आहे. यामुळे एमएमआर परिसरातील विविध शासकीय संस्था, उदाहरणार्थ म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, नगरविकास विभाग यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढला पाहिजे आणि कालबद्ध पद्धतीने घरं उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी मागणी केली. सध्या मुंबईत १८ हजार शासकीय सेवा सदनिका उपलब्ध असून एकूण पोलीस अधिकारी व कर्मचारी ५२ हजार आहेत. पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत ही खूप अपुरी असून बीडीडी चाळीमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांना मालकी हक्काने सदनिका दिल्या आहेत त्याप्रमाणे मुंबईत इतरत्रही पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका कशा देता येतील हे पाहावे. सध्या ज्या ज्या गृहनिर्माण योजना सुरु आहेत त्यात पोलिसांना काही सदनिका राखीव ठेवता येतात का, पुनर्विकसित प्रकल्पांमध्ये प्रोत्साहनपर एफएसआय देता येतो का, तसेच खासगी विकासकांच्या प्रकल्पात सदनिका राखीव ठेवता येतील का, अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने केल्या आणि त्याला प्रतिसाद देत यांवर विचार करून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले.