Raj Thackeray Targets Bhayyaji Joshi Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबाबत एक विधान केलं. त्यावरून राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला असून थेट विधिमंडळ अधिवेशनात याचे पडसाद उमटले. भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या विधानावर सविस्तर भूमिका मांडली आहे. भय्याजी जोशी यांच्या विधानाचा त्यांनी निषेध केला आहे.

राज ठाकरेंनी भय्याजी जोशींच्या विधानाबाबत एक्स अकाऊंटवर सविस्तर पोस्ट शेअर केली आहे. यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाषावार प्रांतरचना या बाबींचा उल्लेख करतानाच भय्याजी जोशींच्या या विधानामागे राजकीय कारण दडल्याचाही उल्लेख राज ठाकरेंनी केला आहे.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असं विधान केल्याच ऐकलं. देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय? भय्याजी जोशींनी असंच विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी पोस्टमध्ये केला आहे. “उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का?” असाही प्रश्न राज ठाकरेंनी सत्ताधारी भाजपाला केला आहे.

“हे न समजण्याइतकी जनता दुधखुळी नाही”

“सध्या मुंबई एमएमआरमधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून व्यक्त होताना दिसत आहेत . हे काय चाललंय हे न समजण्याइतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भानही जोशींनी सोडावं?” अशा शब्दांत राज ठाकरेंनी भय्याजी जोशींना जाब विचारला आहे.

“आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला , त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले. त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये? या असल्या काड्या घालून (अर्थात राजकीय हेतू असल्याशिवाय हे होणे नाही) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे! बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच!” असा सूचक उल्लेख राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं”, असंही त्यांनी पोस्टच्या शेवटी नमूद केलं आहे.

काय आहे भय्याजी जोशींचं विधान?

मुंबतील विद्याविहार येथे भाषण करताना भय्याजी जोशींनी हे विधान केलं आहे. “मुंबईची कुठलीही एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागात वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही”, असं ते म्हणाले.

Story img Loader