Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषणाच्या खास शैलीसाठी आणि त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन करण्याआधी शिवसेनेत होते. शिवसेनेत त्यांची कारकीर्द प्रदीर्घ राहिली. मात्र शिवसेनेतल्या अंतर्गत राजकारणाला ते कंटाळले आणि त्यांनी वेगळा निर्णय घेतला. ‘येक नंबर’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. त्यावेळी राज ठाकरेंनी शिवसेनेतल्या राजकारणाला कंटाळल्यानंतर आपण काय करणार होतो तो किस्सा सांगितला आहे. ज्याची चर्चा घडते आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

“मी ट्रेलर लाँचसाठी आलेल्या माझ्या सगळ्या मित्रांचे आभार मानतो. खासकरुन आमिर खान यांचे आभार. मी त्यांना सांगितलं की ‘येक नंबर’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा आहे तुम्ही यायचं आहे. त्यावेळी कुठलेही आढेवेढे न घेता त्यांनी हो म्हटलं आणि ते उपस्थित झाले. माझे मित्र राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांचेही मी आभार मानतो. सिनेमाच्या स्टोरीत जेव्हा अडथळे आले तेव्हा आशुतोष, राजकुमार यांनी आम्हाला प्रॉब्लेममधून मार्ग काढून दिला आहे.” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : मनसेची बैठक सोडून राज ठाकरेंनी अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट का घेतली? नेमकी काय चर्चा झाली?

२४ वर्षांपूर्वीचा तो किस्सा काय?

राज ठाकरे म्हणाले, “साजिद खान यांचे आभार मानतो, त्याचप्रमाणे साजिद नाडियादवाला यांचेही आभार मानतो. मी २००० साली मी एका वेगळ्या पक्षात होतो. त्यावेळी त्या पक्षात जे काही राजकारण सुरु होतं त्याला मी वैतागलो होतो आणि खूप कंटाळलो होतो. त्यावेळी मी रिव्हर्स गिअर टाकला होता. मला ते राजकारण नकोच असं वाटत होतं. गोंधळ वगैरे काही करायचा नव्हता. मी हळूहळू राजकारण सोडून देईन कुठलाही धक्का वगैरे देणार नाही असं ठरवलं होतं. त्यावेळी मी साजिद नाडियादवाला आणि मी सतत भेटायचो. आमच्यात अनेकदा चर्चा व्हायची. मी साजिद नाडियादवाला याला सांगितलं की मला सिनेमाची निर्मिती करायची आहे. एक दिवस मला साजिद यांनी सांगितलं की राजभाई मी प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर कसं काम करतो मला माहीत आहे. राज ठाकरे प्रोड्युसर झाले तर त्यांना जे करावं लागेल ते मी पाहू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही आहात तिथेच राहा. त्यामुळे मी राजकारणाकडे परत वळलो. मी राजकारणात पुन्हा येण्याचं कारण साजिद नाडियादवाला आहेत.” असं राज ठाकरेंनी सांगताच उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला.

इतक्या वर्षांनी मी प्रॉडक्शन कंपनी सुरु केली

राज ठाकरे म्हणाले, “आज इतक्या वर्षांनी एक प्रॉडक्शन कंपनी सुरु केली. ती सुरु करताना मला तेजस्विनी पंडित भेटल्या. साजिद नाडियादवाला तर होतेच. मराठी सिनेमा जशा प्रकारे बनत आहेत त्या आपल्याला इतर चित्रपटांप्रमाणेच मराठी सिनेमा व्हावा असं वाटत होतं. त्यातूनच येक नंबर सिनेमा उभा राहिला. येक नंबर हे टायटल केदार शिंदेंनी दिलं आहे. मी त्यांचेही आभार मानतो. अजय-अतुल यांच्याबाबत मी वेगळं काय सांगू? त्यांच्याबरोबर अनेक वर्षे मी काम करतोय. अजय आणि अतुल या दोघांना मी त असं म्हटलं की ताकही कळतं आणि ताडीही कळते. चांगलं करायचं आहे की झिंगवालं करायचं आहे गाणं हे त्यांना समजतं.” असंही राज ठाकरेंनी म्हटलं.