भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याणमधील एका पोलीस ठाण्यात घुसून कल्याण पूर्वचे शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेने राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेनंतर गणपत गायकवाड आणि त्यांच्या पाच साथीदारांना उल्हासनगर येथील चोपडा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आमदार गायकवाड आणि इतर आरोपींची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणावरून वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील या गोळीबार प्रकरणावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीवरही बोट ठेवलं. राज ठाकरे म्हणाले, कल्याणमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेला राजकीय झालर आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, मला असं वाटतं की आमदार गणपत गायकवाडांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याच्या खोलात जायला हवं. एखादा माणूस इतक्या टोकाला का जाईल? एखादा माणूस पोलीस ठाण्यात घुसून गोळीबार का करेल? हेदेखील तपासलं पाहिजे. कुठलीही व्यक्ती इथपर्यंतचा निर्णय का घेत असेल? पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करण्यापर्यंत टोकाचं पाऊल का उचललं असेल? त्या माणसाची मानसिक स्थिती काय असेल? इतक्या टोकाचं पाऊल उचलण्याची परिस्थिती का उद्भवली असेल. हे प्रकरण इथपर्यंत कोणी आणलं? याबाबतची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे. न्यायालयात ती चौकशी होईलच.

हे ही वाचा >> “छत्रपतींचं नाव घेतल्यामुळे मुस्लिमांची मतं…”, शरद पवार रायगडावर गेल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

गणपत गायकवाड काय म्हणाले होते?

उल्हासगरमधील गोळीबाराच्या घटनेबाबत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी हल्ल्यानंतर गणपत गायकवाड काय म्हणाले होते त्याबद्दल काही दावे केले होते.वडेट्टीवार यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, ते भाजपाशीसुद्धा गद्दारी करणार आहेत. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचं आयुष्य खराब केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार जन्माला येतील. शिंदे हे महाराष्ट्रात गुंड घडवण्याचं काम करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी माझे कोट्यवधी रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या, पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही, हे महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हल्ल्यावेळचे शब्द आहेत. महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला आज काही गोष्टींची खात्री पटलेली आहे की, एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार हे गद्दार आहेत आणि हे भाजपालादेखील मान्य आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray statement bjp mla ganpat gaikwad shot shivsena mahesh gaikwad political resons asc
Show comments