Raj Thackeray Letter To PM For Bharatratna : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं ९ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या रतन टाटा यांना भारतरत्न मिळायला हवा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न द्या, अशी मागणी केली आहे.

रतन टाटांचं भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदान अफाट

“ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे, तसंच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही!” असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

अशा व्यक्तीला भारतरत्न नाही मग अजून काय?

“काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहिली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनिट स्तब्ध उभे राहिले! आज सकाळपासून सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फूर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून? त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >> Ratan Tata Bharat Ratna Award : उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या, राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला विनंती प्रस्ताव

“तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिकदृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला. आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे”, अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली.

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज शोकप्रस्ताव मांडण्यात आला. तसंच, रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला.