Raj Thackeray Post on Shiv Jayanti 2025: शिवजयंती तारखेनुसार साजरी करावी की तिथीनुसार? यावर अद्याप ठाम असं उत्तर समोर येऊ शकलेलं नाही. पण त्यामुळेच तमाम शिवप्रेमींना आपल्या लाडक्या राजाची जयंती दोन दिवशी साजरी करण्याची संधी मिळत असून ती पूर्ण उत्साहात साधताना महाराष्ट्रासह देशभरातील शिवप्रेमी दिसत आहेत. एकीकडे आज तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जात असताना दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या दिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राज ठाकरेंची सविस्तर X पोस्ट!

राज ठाकरेंनी शिवजयंतीच्या निमित्ताने केलेल्या X पोस्टमध्ये तारखेनुसार की तिथीनुसार? यावर सुरुवातीलाच भाष्य केलं आहे. “आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे”, असा विचार राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये मांडला आहे.

“प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे…”

छत्रपतींबाबत भावना व्यक्त करताना राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचं एक वाक्य नमूद केलं आहे. “महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल. पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेव्हा बाहेर वादळ असतं तेव्हा आत शांत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेव्हा बाहेर शांतता असते तेव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल?” असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

इथे वाचा पूर्ण पोस्ट…

आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती. दरवर्षी महाराजांची जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार साजरी होते. यावर मध्येमध्ये वाद पण होत असतात. खरंतर महाराजांची जयंती ही ३६५ दिवस साजरी व्हायला हवी इतके महाराज लोकोत्तर पुरुष होते. पण ३६५ दिवस साजरी करायची म्हणजे शिवचरित्रातून ३६५ दिवस काही ना काही बोध घेऊन रोजच्या आयुष्यात मार्गक्रमण केलं पाहिजे. वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पहायचं, त्याची ध्येयधोरण आखायची आणि स्वतःच आर्थिक चलन आणायचं , फार्सी भाषा नाकारून स्वतःचा मराठी शब्दकोश निर्माण करायचा , पुढे एक एक किल्ले जिंकायचे आणि लहान वयातच पीछेहाट पण सहन करायची आणि हे करताना आपल्या सोबतच्या सहकाऱ्यांचे मनोधैर्य कुठेही खचू द्यायचे नाही याला एक अद्वितीय प्रतिभाच असली पाहिजे. महाराजांच्या आयुष्यात मधला एक कालखंड असा एक जाणवतो की त्यात फार काही घडत नाही असं वरवर बघणाऱ्याला वाटेल, पण त्याच काळात महाराजांनी खूप पुढची आखणी केली. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तसं, जेंव्हा बाहेर वादळ असतं तेंव्हा शांत आत बसून शक्ती साठवून ठेवावी आणि जेंव्हा बाहेर शांतता असते तेंव्हा आपलं वादळ निर्माण करावं. महाराजांच्या आयुष्याकडे बघितलं की नेहमी कुतूहल वाटतं की ही समज इतक्या लहान वयात कुठून आली असेल. आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल, आणि मग असली किरकोळ नैराश्य कधीच येणार नाहीत. माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शून पण जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो, आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिल आहे. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांकडून सदैव मिळत राहू दे हीच इच्छा. छत्रपती शिवाजी महाराज या अलौकिक नायकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मानाचा मुजरा ! राज ठाकरे।

“आजकाल छोट्या छोट्या पीछेहाटीने किंवा नकाराने नैराश्य येण्याच्या काळात, प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचे पारायण केलं तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा महाराजांनी किती शांतपणे स्वराज्य उभं केलं हे जाणवेल आणि मग असली किरकोळ नैराश्ये कधीच येणार नाहीत”, असंही राज ठाकरेंनी नमूद केलं आहे.

“माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव”

दरम्यान, शिवचरित्राच्या प्रभावामुळेच आपल्याला कधी नैराश्य शिवत नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. “माझ्या संपूर्ण आयुष्यावर शिवचरित्राचा प्रभाव आहे, त्यामुळे कधीच नैराश्य, नकारात्मकता मला स्पर्शूनही जात नाही आणि झटपट यशासाठी कुठलाही शॉर्टकट घ्यावासा वाटत नाही. मला जे योग्य वाटतं ते मी विचारांती बोलतो आणि हे करताना महाराष्ट्र घडवण्याचं माझं जे ध्येय आहे त्यावरची अगाढ श्रद्धा टिकून राहते हे सगळं शिवचरित्राने मला दिलं आहे’, असं आपल्या पोस्टच्या शेवटी राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader