Ramdas Athawale On Nagpur Violence: नागपूर शहरातील विविध भागांत काल (१७ मार्च) मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे पाहायला मिळाले. औरंगजेबची कबर हटवण्याची मागणी करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आंदोलन केले होते. त्यानंतर काल सायंकाळी धार्मिक मजूकूर असलेले कापड जाळल्याचा आरोप करत दुसऱ्या गटाकडून दगडफेक आणि जाळपोळ झाल्याने हा हिंसाचार वाढला.

आता या हिंसाचाराबाबत प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही यावर प्रतिक्रिया देत नागपूरकरांना शांततेचे आवाहन केले आहे. याचबरोबर छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या पाहिल्यानंतर लोक संतापले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

छावा चित्रपटात…

दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहाबाहेर पीटीआयशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, “औंरगजेबाची कबर हटवण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत आहे. ही कबर ५०० वर्षांपासून तिथे आहे. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची हत्या पाहिल्यानंतर लोक संतापले आहेत, म्हणून सर्वत्र निदर्शने होत आहेत. नागपुरात घडलेली अशी घटना दुसरीकडे कुठे घडू नये. मी लोकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करू इच्छितो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये.”

मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत निवेदन

दरम्यान आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिंसाचारा प्रकरणी निवेदन देले आहे. ते म्हणाले, “काल १७ मार्च रोजी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाजी कबर हटवावी असे नारे दिले. यावेळी त्यांनी औरंगजेबाजी प्रतिकात्मक कबर जाळली. यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर विविध कलमांतर्गत दुपारी गुन्हे दाखल केले.”

फडणवीस पुढे म्हणाले, “यानंतर सायंकाळी, सकाळी जाळलेल्या प्रतिकात्मक कबरीवरील कापडावर धार्मिक मजकूर होता अशी अफवा परवण्यात आली. त्यानंतर अत्तरओळमधील नमाज आटोपून २०० ते २५० लोकांचा जमावाने घोषणाबाजी सुरू केली. याच लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे केल्याने पोलिसांनी त्याठिकाणी बळाचा वापर केला.”

गाड्यांची जाळपोळ

“यानंतर पोलिसांनी एकीकडे सकाळी घडलेल्या घटनेविरोधात कारावाई करण्यासाठी तक्रारदारांना बोलवले होते. तर, दुसरीकडे हंसापुरी भागात २००-३०० लोकांनी दगडफेक केली. यामध्ये काहींवर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला तर अनेक वाहने जाळण्यात आली”, असेही फडणवीस यांनी आपल्या निवेदनात सांगितले.

पोलिसांवर हल्ला

फडणवीस पुढे म्हणाले, “हिंसाचाराची तिसरी घटना सायंकाळी साडेसात वाजता भालदारपुरा भागात झाली. ८० ते १०० लोकांचा जमाव तिथे होता. त्यांनी तिथे पोलिसांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांनी अश्रूधूर व सौम्यबळाचा वापर केला. या घटनेत एक क्रेन दोन जेसीबी व काही वाहने जाळण्यात आली. या संपूर्ण घटनेमध्ये ३३ पोलीस जमखी झाले आहेत. यात उपायुक्त दर्जाच्या तीन पोलिसांचा समावेश आहे. यातील एका अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे.”