Ramdas Athawale on Mahayuti Seat Sharing : महायुतीचं जागावाटप सुरू झालं असून जवळपास बहुतेक जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवार येत्या दोन दिवसांत जाहीर होतील. दरम्यान, महायुतीतील नाराजीनाट्य आता समोर येऊ लागले आहे. महायुतीतील घटकपक्ष रिपब्लिकन (आठवले गट) पक्षाने नाराजी उघड केली आहे. महायुतीतील नेत्यांनी आमचा विचार केला नसल्याचं ते आज म्हणाले. एबीपी माझाशी ते बोलत होते.

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर चर्चा झाली. रिपब्लिकन लहान पक्ष असला तरीही जनता जनार्दनचा पाठिंबा आहे. आम्हाला १०-२० जागा नको होत्या. चार पाच जागा मिळाव्यात अशी अपेक्षा होती. भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही रिपब्लिकनच्या मतांचा फायदा होणार आहे. पण तरीही महायुतीच्या नेत्यांनी आमचा विचार केला नाही.”

“आमची यादी त्यांना दिली होती. आम्ही त्याग केला आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकास होत आहे, महाराष्ट्रातही चांगलं काम चाललंय. त्यामुळे महायुतीबरोबर राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षाकडे मोठं समर्थन आहे. त्यामुळे फडणवीसांची भेट घेऊन मुंबईतील एक जागा देण्याची मागणी केली आहे. एक-दोन जागा मिळाव्यात याकरता आग्रहही केला आहे. त्यामध्ये धारावी किंवा चेंबूरच्या जागेवर मागणी केली आहे”, असं रामदास आठवले म्हणाले.

हेही वाचा >> Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला किती जागा मिळणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही..”

दरम्यान, रामदास आठवले यांनी आज उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार होते. त्याकरता ते वर्षा बंगल्याच्या शेजारच्या बंगल्यावर त्यांच्या बोलावण्याची वाट पाहत होते.