निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, तब्बल तीन तास चर्चा केली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क वितर्कांना उधाण आलेले आहेत. तर, देशात भाजपाच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची शरद पवार यांची योजना असून, त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर सुरू झालेल्या नव्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शरद पवारांना सल्ला दिल्याचे दिसून आले आहे.

“प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी, कारण २०२४ मध्ये पंतप्रधान बनणार आहेत नरेंद्र मोदी. ते तर आहेत आंबेडकरवादी, मग का बनणार नाहीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.” असं रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत सांगितलं आहे.

तसेच, “एकतर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली, ही चांगली गोष्ट आहे. शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेत. परंतु सध्या भाजपाच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकत्र येणं अशक्य आहे आणि जरी एकत्र आले तरी देखील २०२४ च्या निवडणुकीत या देशाची जनता नरेंद्र मोदी यांनांच मतदान करणार आहे. त्यानांच पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याचा प्रयत्न या देशातील जनता करणार आहे.” असं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.

शरद पवार – प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला खुलासा

याचबरोबर “एकतर २०१९ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर आमच्यासोबत नव्हते, भाजपासोबत नव्हते. तरी देखील भाजपाने जवळजवळ ३०३ जागा स्वतःच्या बळावर निवडून आणल्या आणि या देशात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता प्रशांत किशोर यांनी तर ममता बॅनर्जींच्या विजयानंतर पश्चिम बंगालनंतर, मी आता अशाप्रकारच्या राजकारणात राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मांडली होती आणि शरद पवारांसोबतची माझी भेट व्यक्तिगत होती, असंही त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे ठीक आहे.. विरोधी पक्षांची त्यांना जर आघाडी करायची असेल तर त्यांना तो अधिकार आहे. परंतु किती जरी आघाडी केली, तरी देखील या देशातील जी परिस्थिती आहे. नरेंद्र मोदींनी मागील सात वर्षांमध्ये जी काही कामं केली आहेत व पुढील तीन वर्ष देखील ते अत्यंत चांगली कामं करणार आहेत. त्यामुळे या देशात काँग्रेसलाच ४०-४२ च्या पुढे जाता येत नाही, तर दुसऱ्या पक्षांना ते कसं शक्य होईल?.” असं देखील रामदास आठवलेंनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत बोलून दाखवलं आहे.

भाजपाच्या बंगालमधील पराभवानंतर काय म्हणाले होते प्रशांत किशोर?

प्रशांत किशोर यांनी भाजपा पश्चिम बंगाल निवडणुकीत दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. जर भाजपाने दोन अंकी आकडा ओलांडला तर आपण संन्यास घेऊ असं त्यांना जाहीर केलं होतं. पण आपलं भाकीत खरं ठरल्यानंतरही त्यांनी संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

Story img Loader