महायुतीमधील घटकपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने त्यांच्या मित्रपक्षांकडे मागील निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. आरपीआयचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले, “अलीकडेच आमची उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी जागावाटपावर चर्चा झाली होती. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणालो होतो की लोकसभा निवडणुकीत आरपीआयला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कमीत कमी आठ ते दहा जागा मिळायला हव्यात. महायुतीत खूप मित्रपक्ष असले तरी सर्वांना न्याय मिळायला हवा. आम्ही केलेल्या मागणीत थोडंफार कमी-जास्त होऊ शकतं.

रामदास आठवले म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. परंतु, आता आम्ही विधानसभेच्या काही जागा लढण्याचा आणि त्या निवडून आणण्याचा निर्धार केला आहे. इंडिया आघाडीवाल्या लोकांच्या अपप्रचारामुळे आम्हाला लोकसभा निवडणुकीत अपयश आलं असली तरी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्याची कसर भरून काढू. इंडिया आघाडीने देशात आणि राज्यात संविधानाबाबत अफवा पसरवली ज्यामुळे आम्हाला फटका बसला. परंतु, विधानसभा निवडणुकीत आम्ही या गोष्टीची काळजी घेऊ. दलित आणि अल्पसंख्याकांमधील नाराजी दूर करू आणि त्यांना आमच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करू.”

रामदास आठवले यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक, महायुतीची तयारी आणि आरपीआयच्या कामांवर भाष्य केलं. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, तुमच्या पक्षाला आठ ते १० जागा मिळतील का? यावर रामदास आठवले म्हणाले, आम्ही मागणी तरी आठ ते १० जागांची केली आहे. चर्चेला बसल्यानंतर कोणते उमेदवार उभे करणार? कोणते मतदार संघ आम्हाला मिळणार? यावर विचारविनिमय होईल आणि त्यानंतर यात काही जागा कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही आठ ते १० जागांची मागणी केली आहे.

हे ही वाचा >> “भाजपावरील नाराजीचा आम्हाला फटका”, अजित पवार गटाचं वक्तव्य; महायुतीत बिनसलं? RSS चा उल्लेख करत म्हणाले…

भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर असलेल्या मित्रपक्षांना अपेक्षित जागा देत नाही, असा आरोप केला जातो यावर काय सांगाल? असा प्रश्न विचारल्यावर रामदास आठवले म्हणाले, लोकसभेला भाजपाने एकनाथ शिंदेंच्या पक्षाला १५ जागा आणि अजित पवारांच्या पक्षाला चार जागा दिल्या होत्या. आमच्या पक्षाला त्यावेळी एकही जागा मिळाली नाही. कारण मी एका मतदारसंघात अडकून राहिलो तर राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करायला मला वेळ देता आला नसता. त्यामुळे आम्ही वेगळे निर्णय घेतले. मी प्रचारात उतरलो, आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात उतरले आणि आम्ही १७ जागा निवडून आणल्या. या १७ जागा निवडून आणण्यात आरपीआयचा मोठा वाटा आहे.