केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं विधान केलं आहे. रामदास आठवले यांना २०१४ साली भाजपाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्यात आलं आहे. तसंच रामदास आठवले हे सध्या नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. रामदास आठवले यांनी सहकुटुंब संगमनेर तालुक्यातील भोजदरी या अतिदुर्गम भागाला भेट दिली. विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी ते संगमनेर तालुक्यात आले होते. यावेळीच त्यांनी त्यांना पुन्हा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याचा विचार करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. रामदास आठवले यांना शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना सुरवात झाली आहे.
२००९ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी रामदास आठवले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत होते. २००९ साली रामदास आठवले यांनी शिर्डीमधून लोकसभा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत रामदास आठवले यांचा पराभव झाला होता. शिर्डी हा मतदार संघ त्यावेळी आघाडीसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघांपैकी एक मतदार संघ मानला जात होता. त्यामुळे शिर्डीसारख्या सुरक्षित मतदार संघात झालेला पराभव तेव्हा रामदास आठवले यांच्या जिव्हारी लागला होता. पराभवानंतर त्यांनी या पराभवाचं खापर नगर जिल्ह्यातील काही बड्या काँग्रेसच्या नेत्यांवर फोडलं होतं. तत्कालीन कॉंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे- पाटील यांना रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी जबाबदार धरले होते. शिर्डीमधून मला आपल्याच नेत्यांनी पराभूत केल्याचा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. आता रामदास आठवले भाजपासोबत आहे आणि २००९ साली रामदास आठवले यांनी त्यांच्या पराभवासाठी ज्यांना जबाबदार धरले होते ते राधाकृष्ण विखे पाटीलसुद्धा आता भाजपामध्ये आहेत. यापूर्वी एका कार्यक्रमात रामदास आठवले यांनी आता मला शिर्डीत मदत कराल ना ? असा गमतीने प्रश्न विचारला होता. रामदास आठवले आता पुन्हा शिर्डीच्या वाटेवर जाण्याच्या विचारात आहेत. मात्र राधाकृष्ण विखे पाटील यावेळी त्यांना मदत करणार का यावर पुढील गोष्टी अवलंबून असतील.
रामदास आठवले बोलताना रामदास आठवले यांनी शिवसेनेसोबतच्या संबंधाबतही भाष्य केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आमचे सध्या पटत नसले तरी जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही पटवुन घेणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले त्यांनी सांगितले.