आनंद दिघे यांना मारण्यात आलं होतं, त्यांचा घातपात झाला होता. हे ठाणे जिल्ह्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासंदर्भात आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

रामदास कदम यांनी आज रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना संजय शिरसाट यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचं काम केलं, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा – Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंचा घात झालाय”, शिरसाटांच्या विधानावर केदार दिघेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “माझी तयारी आहे की…”

नेमकं काय म्हणाले रामदास कदम?

आनंद दिघे यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत. त्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा कुणी खून केला का, यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. पण एवढचं निश्चित आहे, ही आनंद दिघे यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ठाणे जिल्हाप्रमुखाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी मागितला होता. यासंदर्भात स्वत: आनंद दिघे आणि माझी चर्चा झाली होती. आनंद दिघे यांचे खच्चीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरे यांच्याकडून होत होतं, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली.

आनंद दिघेही मोठी व्यक्ती होती. ते बाळासाहेबांना देवासमान मानत होते. काही लोक म्हणतात, की आनंद दिघेंना बाळासाहेबांपेक्षा मोठ करण्याचं काम सुरू आहे, मात्र, हा आरोप दिशाभूल करणारा आहे. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, त्यांच्या पेक्षा मोठं कुणीही होऊ शकत नाही. आनंद दिघे यांनी जे काही काम केलं आहे, ते बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच केलं आहे. खरं तर पक्षात आपल्यापेक्षा मोठं कुणी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक प्रयत्न केले. माझ्यासह अनेक नेत्यांची पखं त्यांनी कापली, त्यामुळे आनंद दिघे यांची पंख कापण्याचे कामही उद्धव ठाकरेंनी केलं की काय, असा संशय माझ्या मनात आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Anand Dighe Death Case : “आनंद दिघेंना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय”, शिंदे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “कोणतं इंजेक्शन…”

संजय शिरसाट काय म्हणाले होते?

“आनंद दिघेंना मारलं गेलंय, हे संपूर्ण ठाणे जिल्हा जाणतोय. दुपारी आनंद दिघेंना डिस्चार्ज देण्यात येणार होता. पण अचानक त्यांचं निधन झालं. बोलता चालता निधन झालं? या सर्व गोष्टी कालांतराने समोर येतील. त्या हॉस्पिटलला आग लागली होती. रुग्णालयात असंख्य रुग्ण होते. त्या सर्वांना वाचवायचं काम शिवसैनिकांनी केलं”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं होतं.