Raj Thackeray is like Bal Thackeray for us says Ramdas Kadam : महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होण्याआधी निर्णयांचा धडाका लावला आहे. महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. यासह इतरही अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम यांनी राज्य सरकारच्या निर्णयांचं स्वागत केलं आहे. तसेच ते म्हणाले, “महाराष्ट्रात आजवर अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. मात्र, या सरकारने सर्वाधिक व लोकाभूमिक निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते आहेत. यांच्या सरकारने गेल्या अडीच वर्षांत २५० हून अधिक लोकाभिमूक निर्णय घेतले आहेत”.

दरम्यान, मुलुंड येथील टोलनाक्यासह राज्यभरातील अनेक टोलनाके बंद व्हावेत यासाठी आंदोलन पुकारणाऱ्या मनसेनेही मुंबईतील प्रवेशद्वार असलेल्या पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयावर एक टिप्पणी केली आहे. राज ठाकरे म्हणाले होते, “हा टोलमाफीचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेलं शहानपण आहे”. राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेवर रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे.

हे ही वाचा >> Malad Mob Lynching : मालाडमध्ये जमावाच्या मारहाणीत मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू; व्हायरल व्हिडिओची पक्षाने घेतली दखल, नेते म्हणाले…

रामदास कदम काय म्हणाले?

रामदास कदम म्हणाले, “एखादी मागणी करणे आणि ती लावून धरणे यात खूप मोठा फरक आहे. राज ठाकरे हे नेहमी स्पष्ट बोलतात. आम्ही त्यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांना पाहतो. मी त्यांना सल्ला देणार नाही, मी तसा प्रयत्न केला तर ते चुकीचं ठरेल. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की त्यांनी चांगल्या कामाला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. निवडणुका आल्यावर प्रत्येक गोष्टीवर टीका केलीच पाहिजे असं नाही. राज ठाकरे स्पष्टवक्ते आहेत. देशात त्यांची तशीच प्रतिमा आहे. ती प्रतिमा त्यांनी तशीच राहू द्यावी, अशी माझी त्यांना विनंती आहे. हा निर्णय उशिरा घेतला गेला नाही. उलट त्यांनी या निर्णयाचं कौतुक करायला हवं.

हे ही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Date Live : राज्यात आज लागणार आचारसंहिता, दुपारी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा; इतर अपडेट वाचा एका क्लिकवर…

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. आज (१५ ऑक्टोबर) निवडणूक आयोग महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मनसेला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, मनसेने अद्याप कोणत्याही युती-आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला नाही.