अलिबाग– रतन टाटा आणि अलिबाग तालुक्यातील वरसोली गावाचे अतिशय जिव्हाळ्याचे संबध होते. सुट्टीसाठी अधून मधून ते गावातील आपल्या छोटेखानी बंगल्यात येऊन राहत असत. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच वरसोली गावात शोककळा परसली. वरसोली ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.  .

वरसोली समुद्र किनाऱ्या जवळ रतन टाटा यांचे छोटेसा बंगला आहे. या घरात ते सुट्टीसाठी अधून मधून येत असत. सर्व सामान्य गावकऱ्यांप्रमाणे त्याचे इथे वास्तव्य असे. वरसोलीत वास्तव्यास असतांना ते सुरक्षा व्यवस्थेचा कुठलाही गराडा आपल्या आसपास ठेवत नसत. समुद्र किनाऱ्यावर त्यांचा घरातील कुत्रा आणि ते फेरफटका मारत असत, आणि त्यांच्या आवडत्या इंडिका कारमधून आसपासच्या परिसराची सैर करणे हा त्यांचा आवडता छंद होता. गाडीचे सारथ्य बरेचदा ते स्वतः करत असत. अलिबागला येण्यासाठी ते बरेचदा जलप्रवासी वाहतुकीचा वपर करत, मात्र हा प्रवास करतांना सर्वसामान्य प्रवाश्यांप्रमाणे त्यांचे आचरण असे, प्रवाश्यांच्या रांगेत उभे राहण्यात त्यांनी कधी कमीपणा वाटून घेतला नव्हता. 

हेही वाचा >>>रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनाच्या उमेदवारांचे काम न करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय, पक्ष बदलण्याचा निर्णय

गावातील विकास कामांना त्यांची मदत होत असे, वरसोली समुद्र किनाऱ्यावर त्यांनी स्वच्छता गृह बांधून दिले होते. त्याच बरोबर गावात सौर पथदिवे बसविण्यासाठी त्यांनी मदत केली होती. गावासाठी फिल्टरेशन प्लांट उभारणी सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. करोना काळात वरसोली कोळीवाड्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय खलाशांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांनी करून दिला होता. तर वरसोली ग्रामस्थांसाठी कोव्हीड लसींची उपलब्धता करून देण्यासाठी रतन टाटा यांनी मदत केली होती.

हेही वाचा >>>Ratan Tata Death : अखेरचा सलाम! उदार अंत:करणाच्या उद्योजकाला निरोप देताना महाराष्ट्रासह देशही हळहळला

अलिकडच्या काळात वयोमानानूसार त्यांचे गावाकडे येणे त्यांनी कमी केले होते. मात्र पूर्वी नियमितपणे ते गावात येऊन राहत असत, आपल्यामुळे गावातील कोणालाही त्रास होऊ नये याची खबरदारी ते कायम घेत असत अशी माहिती माजी सरपंच मिलिंद कवळे यांनी दिली. गावकऱ्यांशी त्यांचा वैयक्तिक संपर्क नव्हता. पण पूर्वी वरसोलीच्या समुद्र किनाऱ्यावर पांढरा टीशर्ट आणि पांढरी शॉर्ट्स अशा पेहरावात फिरतांना दिसत असत अशी आठवण वरसोलीचे हर्षल नाईक यांनी सांगितली. ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी आज  रतन टाटा यांच्या आठवणींना उजाळा देत श्रध्दांजली वाहीली. भारतीय उद्योग जगतातील आदर्श व्यक्तिमत्व हरपल्याची भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.