रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. त्यांच्याकडे महायुती सरकारमध्ये सध्या उद्योगमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फुट पडल्यानंतर उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झाले. उदय सामंत यांची रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. २०१९ मध्ये सलग चौथ्यांदा ते या मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले. उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून २००४ आणि २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा विजय झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेकडून लढवली. दोन्ही निवडणुकांमध्ये ते विजयी झाले.

२०२४ मध्ये झालेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना ५० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत यंदा चुरस पाहायला मिळणार आहे. उदय सामंत यांची महायुतीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा : Malegaon Outer : मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघावर दादा भुसेंचं वर्चस्व नेमकं कसं आहे? जाणून घ्या

२०१४ व २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील स्थिती

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे गेले होते. त्यावेळी भाजपचे बाळ माने यांचा शिवसेनेच्या उदय सामंत यांनी पराभव केला होता. सामंत यांना ९३८७६ मते मिळाली होती, तर माने यांना ५४४४९ मते मिळाली होती. भाजपचे बाळ माने हे १९९९ मध्ये रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडूण गेले होते. त्यानंतर २००४, २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये उदय सामंत यांनी भाजपच्या बाळ माने यांचा सलग तीन वेळा पराभव केला.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार होते. त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांच्याविरोधात झाली. या निवडणुकीत सामंत यांना ११८४८४ मते मिळाली, तर मयेकर यांना केवळ ३११४९ मते मिळाली. ८७ हजारांहून अधिक मताधिक्याने सामंत विधानसभेवर निवडूण गेले.

हेही वाचा : Kopari Pachpakhadi Vidhan Sabha Constituency : एकनाथ शिंदेंविरोधात कोण लढणार? मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात महासंग्राम रंगणार!

कोणाला उमेदवारी मिळणार?

महाविकास आघाडीकडून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील फुटीनंतर शिवसेनेचे विद्यमान आमदार उदय सामंत हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले. त्यामुळे आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांच्याविरोधात प्रबळ उमेदवार देण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे आहे. ठाकरे गटाकडून सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने व माजी नगराध्यक्ष प्रदीप साळवी इच्छुक आहेत. २०१९ मध्ये सामंत यांच्या विरोधात लढणारे राष्ट्रवादीचे उमेदवार सुदेश मयेकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांनी रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : शरद पवारांची महायुतीवर टीका, “पुण्याचं वैशिष्ट्य विचारलं की लोक म्हणतात कोयता गँग”

रत्नागिरीची भौगोलिक स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात डोंगराळ भाग मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे. उत्तरेकडे रायगड जिल्हा आहे. तर पूर्वेकडे सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे आहेत. दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. आंबा, नारळ, फणस, सुपारी, भात, नाचणी ही प्रमुख पिके रत्नागिरीत घेतली जातात.