लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : देशातील निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करण्यात आली आहे. मँगोनेट या प्रणालीद्वारे ही नोंदणी करण्यात आली आहे. संपुर्ण देशात आंबा निर्यातीत महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले असून, राज्यातील १७ हजार ६९१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ६ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, रत्नागिरी जिल्ह्याने देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे देशातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन आणि निर्यात महाराष्ट्र राज्यासह रत्नागिरी जिल्ह्यातून होणार आहे.
भारतातील सर्वांत जास्त आंबा उत्पादन हे महाराष्ट्रात होते. जे शेतकरी निर्यातक्षम आंबा उत्पादन करतात अशा शेतकऱ्यांनी आपल्या आंबा बागांची आणि शेतीची नोंदणी मँगोनेट प्रणालीद्वारे नोंदणी करून घेतली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, देशात एकूण २३ हजार १५७ शेतकऱ्यांनी निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात आलेली आहे. मात्र यातील १७ हजार ६९१ शेतकरी हे केवळ महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे निर्यातीसाठी ७६ टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. त्यातील सर्वात जास्त म्हणजे ६ हजार ९९६ शेतकरी हे रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.
राज्यातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिळून १७ हजार ६९१ बागांची नोंद केल्या आहेत. त्यातील सर्वांत जास्त बागा या रत्नागिरी जिल्ह्यातील असून, येथील ६ हजार ९९६ बागांची नोंद मँगोनेट प्रणालीद्वारे करण्यात आली आहे. तर बीड जिल्ह्यातील सर्वांत कमी म्हणजे २२ बागा नोंदविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वांत जास्त आंबा उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख देशभर झाली आहे.