लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला फारसं यश मिळवता आलं नाही तर महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा जिंकण्यात यश मिळालं. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत काही मतदरासंघ चांगलेच चर्चेत होते. यामध्ये कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघही चांगलाच चर्चेत होता. हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढत झाली होती. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने, ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर निवडणुकीच्या मैदानात होते. या निवडणुकीत शिंदे गटाचे धैर्यशील माने यांचा विजय झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विजयानिमित्त धैर्यशील माने यांचा शिराळमध्ये सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी नाही तर खासदारकीसाठी लढत होते. त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी तुमचा गुलाम राहणार असं लिहून दिलं होत”, असा खोचक टोलाही सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना लगावला.

हेही वाचा : नाराज भुजबळ राजकारणातलं वर्तुळ पूर्ण करणार? लवकरच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश?

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“जो माणूस म्हणत होता की मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. मी कोणत्याही आघाडीत जाणार नाही. मी शेतकऱ्यांसाठी लढत असून मी शेतकऱ्यांचाच उमेदवार असणार आहे. पण त्याच माणसाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना लिहून दिलं होतं की, मी तुमचा गुलाम राहणार आहे. फक्त मला पाठिंबा द्या”, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली.

“राजू शेट्टी शेतकऱ्यांना सांगायचे की त्यांच्याविरोधात लढायचं. हे ते उघड बोलले आहेत. त्यामुळे निश्चितपणे राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते, तर ते फक्त खासदारकीसाठी लढत होते. हे आता स्पष्ट झालं आहे”, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

राजू शेट्टींमध्ये प्रचंड अहंकार

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा पराभव झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी बोलताना राजू शेट्टींमध्ये प्रचंड अहंकार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं की, “राजू शेट्टींमध्ये प्रचंड अहंकार आला होता. चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं, त्यांना अपमानजनक वागणूक द्यायची. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचायचं, बदनाम करायचं. कट कारस्थान करायचं, हे असं केल्यामुळे जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले. मी काय गुन्हा केला? असं ते म्हणाले, पण त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत. आंदोलन करताना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात चळवळ उभा केली. मात्र, भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना स्वत:च्या स्वार्थासाठी युती तोडून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यानंतर शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. नंतर बाजूला झाले. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतली”, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rayat kranti sanghatana leader sadabhau khot criticized to raju shetti in hatkanangle lok sabha election gkt