हर्षद कशाळकर

एका हाताने दिले दुसऱ्या हाताने काढून घेतले अशी गत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची झाली आहे. जिल्ह््यातील अनेक शेतकऱ्यांना योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर दिलेली रक्कम दोन वर्षांत परत घेण्यात आली आहे.

जिल्ह््यात १ हजार ९६२ शेतकऱ्यांकडून १ लाख ९५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सन्मानाने दिलेली रक्कम सक्तीने वसुली सुरू केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने देशभरात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१८ सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २ हेक्टरपेक्षा कमी जमीन धारणा असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होत असते. या महत्त्वाकांक्षी योजनेतून रायगड जिल्ह््यातील १ लाख ४ हजार ५५२ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यांच्या खात्यात योजनेचा मदत निधी जमाही करण्यात आला होता.

आता मात्र यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी आयुक्त कार्यालयाने योजनेसाठी अपात्र ठरविले आहे. अपात्र शेतकऱ्यांची यादी संबंधित जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात आली आहे. यानंतर महसूल प्रशासनाकडून योजनेअंतर्गत अपात्र ठरविण्यात आलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दोन वर्षांत त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम सात दिवसांच्या आत परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे जे शेतकरी ही रक्कम परत देणार नाहीत त्यांच्यावर जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम १७४ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

योजनेसाठी जिल्ह््यात १३ हजार ७६५ शेतकरी अपात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून ४ कोटी २६ लाख रुपयांची वसुली सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह््यात १ हजार ९६२ शेतकऱ्यांकडून १ लाख ९५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. अपात्र लाभार्थ्यांमध्ये आयकर भरणारे ३ हजार ४५२ शेतकरी आहेत. तर इतर कारणांमुळे अपात्र ठरलेले १० हजार ३१३ शेतकरी आहेत. यातील आयकर भरणाऱ्या १ हजार ७०९ शेतकऱ्यांकडून १ कोटी ७३ लाख ४ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तर इतर कारणांनी अपात्र ठरलेल्या २५३ शेतकऱ्यांकडून २२ लाख ४० हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.

प्रशासनाने बजावलेल्या या नोटिसांमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. यातील अनेकांना आपल्याला योजनेअंतर्गत का अपात्र ठरविण्यात आले याचीही माहिती नाही. आता या सक्तीच्या वसुलीने शेतकरी हैराण आहेत. आधीच करोनाचा प्रादुर्भाव, टाळेबंदी, निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टी यांसारख्या आपत्तींनी शेतकरी बेजार आहेत. अशात आता या सक्तीच्या वसुलीने त्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच बिकट झाली आहे.

वसुलीची सद्य:स्थिती….

आयकर भरत असल्याने ३ हजार ४५२ अपात्र ठरले. त्यांच्या खात्यावर १६ हजार ८४६ हप्त्यात एकूण ३ कोटी ३२ लाख ९२ हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. ही सर्व रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यापैकी १ हजार ७०९ शेतकऱ्यांकडून ८ हजार ७०९ हप्त्यांचे १ कोटी ७३ लाख ४ हजार जमा करण्यात आले आहेत. तर १० हजार ३१३ शेतकरी इतर कारणांमुळे अपात्र ठरले, त्यांच्याकडून ४ हजार ६६४ हप्त्यांचे ९३ लाख २८ हजार रुपये वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापैकी २५३ शेतकऱ्यांनी १ हजार ११८ हप्त्यांचे २२ लाख ४० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.

कृषी आयुक्तालय, पुणे यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला पंतप्रधान किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. यानुसार अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना संबंधित तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, सात दिवसांत शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत त्यांना मिळालेली रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या योजनेत अनेक अपात्र लाभार्थ्यांचा समावेश झाला होता. यात आयकर भरणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यानुसार अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांकडून दिलेली रक्कम वसूल केली जात आहे. १ कोटी ९५ लाख रुपयांची रक्कम आत्तापर्यंत अपात्र लाभार्थ्यांनी जमा केली आहे.

– विशाल दौंडकर, तहसीलदार, महसूल विभाग रायगड.