छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र भूषण, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे शहरात रविवारी महास्वछता अभियान आयोजित केले होते. यामध्ये नागरिकांनी सहभागी होत स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतला. सकाळी ९:३० पासून ११:३० वाजेपर्यंत प्रतिष्ठानच्या १ हजार ३३ स्वयंसेवकांनी ४० किलोमीटर रस्त्यांवरील २६४ टन कचरा उचलला. यामध्ये ७५५ क्विंटल ओला तर १ हजार ६५६ क्विटंल सुक्या कचर्‍यांचे संकलन करण्यात आले.

जनमानसांत स्वच्छतेविषयी जागृती, विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता यावी, प्रत्येक परिसर स्वच्छ राहण्याकरिता प्रशासकीय कार्यालये, वाहतूक मार्ग स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड, आणि स्वच्छता अभियान असे उपक्रम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतात. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या हा कार्याची देशभरात ख्याती असून, स्वयंप्रेरणा आणि सेवाभाव या हेतूने मोहीम यशस्वी होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि जिल्हा प्रशासन, जिप आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात येते. शहरात रेल्वे स्टेशन ते जय टॉवर, महावीर चौक मिल कॉर्नर, सिडको बसस्थानक आयजीटीआर कॉलेज, भडकल गेट आमखास मैदान, जळगाव टी पॉईंट दिल्ली गेट, क्रांती चौक सुपारी हनुमान, वाळूज, बजाजनगर, वैजापूर, पैठण आदीसह ग्रामीण भागात येथे ही सदस्य स्वयंसेवकांच्यावतीने महास्वच्छता अभियान राबविले आहे.

Story img Loader