मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार असल्याने सत्ताधारी महायुतीला सरकारी योजनांची जाहिरातबाजी करण्यास पुरेसा अवधी मिळणार असला तरी महाविकास आघाडीसाठी निवडणूक लांबणीवर पडणे गैरसोयीचे ठरणारे आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर तसेच हरियाणा या दोन्ही राज्यांच्या निकालांचा राज्यावर नक्कीच परिणामकारक ठरू शकतो. भाजपचा पराभव झाल्यास महायुतीसाठी ते धोकादायक ठरू शकते. महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपुष्टात येत असल्याने दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक होईल, असे संकेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. हेही वाचा >>> मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा; उद्धव ठाकरे यांची भूमिका, महाविकास आघाडीने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले विधानसभेची मुदत संपण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांना लोकप्रिय सरकारी योजनांची जाहिरातबाजी करण्यास पुरेसा अवधी मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, अन्नपूर्णा योजना, लाडका भाऊ, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आदी लोकप्रिय घोषणांचा लोकांना लाभ मिळाला तरच त्याचा निवडणुकीत फायदा होऊ शकतो. पुढील महिनाभर तरी या योजनांची जोरदार हवा तयार करण्याची महायुतीच्या नेत्यांची योजना आहे. यामुळेच निवडणूक लांबणीवर जाणे हे सत्ताधारी पक्षाला आवश्यकच होते. निवडणूक दिवाळीपूर्वी होणे महाविकास आघाडीसाठी फायद्याचे होते. लोकसभा निकालातून सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणामध्ये लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या विरोधातील असंतोष बघायला मिळाला. दहापैकी प्रत्येकी पाच जागा भाजप आणि काँग्रेसने जिंकल्या आहेत. २०१९ मध्ये भाजपने सर्व दहाही जागा जिंकल्या होत्या. हरियाणाचा कौल भाजपच्या विरोधात गेल्यास त्याचा राज्यावरही राजकीय परिणाम होऊ शकतो. हरियाणा जिंकल्यास भाजपला राज्यातही प्रचाराला अधिक वाव मिळेल. इच्छुकांवरील ताण वाढला दिवाळीनंतर निवडणूक होणार असल्याने सर्वपक्षीय विद्यामान आमदार, इच्छुकांना दिवाळीनिमित्त मतदारांना खुश करावे लागणार आहे. दिवाळीनंतर निवडणूक असल्याने खर्चात वाढ होणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. कारण दिवाळीत मतदारांना खुश करण्याकरिता खर्च वाढणार आहे, अशी प्रतिक्रिया एका उमेदवाराने व्यक्त केली.