Rohit Pawar : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला आणि छावा या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीवर आधारित असलेला छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चर्चेत आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेलं क्रौर्य, संभाजी महाराजांची भूमिका या सगळ्याबाबत चर्चा होते आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनीही हा सिनेमा पाहिला. त्यानंतर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांविरोधात झालेल्या फितुरीचा मुद्दा त्यांनी त्यांच्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

सध्या छावा चित्रपटाचा सर्वत्र बोलबाला आहे. प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्याने काल सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. आधी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून डॉ. अमोल कोल्हे यांनी तर आता छावा चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता विकी कौशल याने आपल्या कसदार अभिनयाने छत्रपती संभाजी महाराजांचं अफाट कर्तृत्त्व, उत्तुंग नेतृत्त्व, असीम त्याग, पराक्रम, वाघासारखं धैर्य आणि शौर्य हे सामान्य माणसांसमोर आणलं. याबद्दल या दोघांचेही मनापासून आभार!

मनुस्मृतीचा उल्लेख करत काय म्हणाले रोहित पवार?

छावा चित्रपटाच्या माध्यमातून आभाळाएवढा आपला राजा पाहून जेवढा आनंद झाला तेवढंच दुःख त्यांना देण्यात आलेल्या यातना पाहून झालं. अनन्वित अत्याचार करुनही शंभूराजे आपल्या भूमिकेपासून तसूभरही हटले नाहीत किंबहुना मरण स्वीकारलं पण शरण गेले नाहीत. त्यांचा केलेला अनन्वित छळ आणि दिलेल्या मरणयातना म्हणजे मनुस्मृतीतील शिकवणुकीचा प्रयोग होता. मनुस्मृतीत सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा अमानवी पद्धतीने छळ कसा करायचा याबाबतची माहिती औरंगजेबापर्यंत कुणी पोचवली, हेही पाहण्याची गरज आहे. या घटनेला कुठलंही एक कुटुंब नाही तर अनेकजण जबाबदार होते, पण ते तितक्या योग्य पद्धतीने समोर आणलं गेलं नाही. कदाचित भविष्यात ते अधिक स्पष्टपणे पुढं येईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

संकटाला झुंजण्याची प्रेरणा चित्रपट देतो-रोहित पवार

लाचारी सोडून कसल्याही संकटाला भिडण्याची, लढण्याची आणि झुंजण्याची प्रेरणा या चित्रपटातून मिळते. शिवाय शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो पण काही जवळच्या माणसांपासूनही सावध राहण्याची गरज असते याचाही धडा मिळतो आणि आजच्या राजकीय परिस्थितीत तर सर्वांनाच हा धडा तंतोतंत लागू होतो.

अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. छावा चित्रपटाचं देशभरात कौतुक होतं आहे. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर रश्मिका मंदानाने येसुबाईंची भूमिका साकारली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान या चित्रपटात अक्षय खन्नाने औरंगजेब ही भूमिका साकारली आहे. त्याच्या भूमिकेचंही कौतुक होतं आहे.

Story img Loader