कर्जत-जामखेडमधील एमआयडीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राम शिंदे आणि भाजपाचे आमदार राम शिंदे हे समोर-समोर आले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, ‘मग मी काय करू’ असं उत्तर दिलं आहे. तसेच, ‘राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीसीचा प्रश्न सुटेल,’ असं अजित पवारांनी म्हटलं. यावर आता रोहित पवारांनी भाष्य केलं आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
रोहित पवार म्हणाले, “राम शिंदे सांगतील, तसं व्हावं. पण, हजार एकरापेक्षा कमी परिसरात एमआयडीसी नको. कर्जतमध्ये बऱ्याच ठिकाणी माळढोक पक्षाचा आणि जंगलाचा प्रश्न आहे. आम्ही निवडलेल्या जागी मोठ्या कंपन्या येऊ शकतात. मात्र, ही जागा बदलली, तर फक्त गोडाऊनच होऊ शकतात. त्यामुळे जास्ती लोकांना नोकरी मिळू शकणार नाही.”
“…तर आम्ही शांत बसणार नाही”
“आम्ही अभ्यास करून घेतलेला निर्णय योग्यच आहे. त्याबाबत अजित पवार लक्ष घालतील. पण, निर्णय चुकला, तर आम्ही शांत बसणार नाही,” अशा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.
“ललित पाटील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी”
ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न विचारल्यावर रोहित पवारांनी म्हटलं, “ललित पाटीलने सांगितलं होतं की ‘माझ्याकडे काही नेत्यांची नावे आहेत.’ अद्याप ही नावे पुढे आली नाहीत. हा विषय संवेदनशील आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे.”
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“राम शिंदे सांगतील, त्या पद्धतीनं कर्जत एमआयडीची प्रश्न सुटेल. नियमाच्या चौकटीत बसून तो मुद्दा सोडवावा लागेल. तिथं तरूण-तरूणींना रोजगार कसा मिळेल, याचा विचार केला पाहिजे. त्याठिकाणी गुंतवणूक कशी होईल, यासाठी महायुतीचा प्रयत्न चालला आहे,” असं अजित पवारांनी सांगितलं.