राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै २०२३ या दिवशी फूट पडली आहे. कारण याच दिवशी अजित पवार यांनी आपल्या पक्षातल्या काही लोकांना बरोबर घेऊन सत्तेत सहभागी होणं पसंत केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहेत. या दोन गटांमधला संघर्ष जुलै २०२३ या महिन्यात समोर आला होता. तसंच रोहित पवार यांची संघर्ष यात्राही चर्चेत होती. अशात आता पुतणे रोहित पवार यांनी काका अजित पवार यांना एक खुलं पत्र लिहिलं आहे. भाजपाचे हैदराबादचे आमदार टी. राजा यांना कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलवण्यात आलं आहे. टी. राजा त्यांच्या प्रक्षोभक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणामुळे वातावरण दूषित होऊ शकतं असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. तसंच शरद पवार यांना सोडून गेल्याचा संदर्भ देत अजित पवारांना पुतणे रोहित पवार यांनी भावनिक साद घातली आहे.

काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?

मा. अजितदादा,

आपण नेहमीच पुरोगामी विचारांना आपल्या जीवनात प्राधान्य दिलं आहे. पुरोगामी विचारांचे उद्गाते शहर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाची वैचारिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात आपण नुकतंच जाऊनही आलात. कोल्हापूरने नेहमीच महाराष्ट्राला वैचारिक दिशा दिली परंतु याचाच राग मनात धरून प्रतिगामी शक्तींकडून राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीवरच वैचारिक आक्रमण करून इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे परंतु कोल्हापूर शहराची स्वतःची एक वैचारिक प्रतिकारशक्ती असल्याने अद्याप तरी प्रतिगामी शक्तींना यश आलेलं नाही.

हे पण वाचा- “आम्ही त्याचा इव्हेंट करत नाही, माझी ५ तास चौकशी झाली…”, रोहित पवारांच्या ईडी नोटीशीवर अजित पवार म्हणाले…

टी राजा द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध

याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या प्रक्षोभक द्वेषपूर्ण भाषणांसाठी प्रसिद्ध असलेले आमदार टी राजा यांना कोल्हापूरमध्ये बोलावण्यात आलंय. हे आमदार कोल्हापुरात येऊन इथलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करतील म्हणून अशा व्यक्तीचे कार्यक्रम कोल्हापुरसह महाराष्ट्रात कोठेही होऊ नये, अशी पुरोगामी विचारधारा जपणाऱ्या सामान्य कोल्हापूरकरांची इच्छा आहे.

शरद पवारांची साथ सोडून तुम्ही..

दादा, आपण पुरोगामी विचारधारेचे आधारस्तंभ आहात. आदरणीय पवार साहेबांना सोडून प्रतिगामी शक्तींशी संगत केली असली तरी आपल्यातला पुरोगामी विचारांचा दादा अद्यापही तसाच आहे असं मानून टी राजा यांच्या कार्यक्रमास परवानगी देऊ नये ही सामान्य कोल्हापुरकरांच्या वतीने आपणास नम्र विनंती. स्वतःचं अपयश लपविण्यासाठी सत्ता असूनही सामान्यांच्या हिताला प्राधान्य न देता भाजपकडून केवळ महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राची विचारधारा पुसण्याचं काम केलं जात असल्याने आपण पुरोगामी विचारधारेचे पाईक व उपमुख्यमंत्री म्हणून या प्रश्नी लक्ष घालाल ही अपेक्षा!

आता उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्राला उत्तर देणार का? हा प्रश्न आहे. तसंच ते टी. राजा यांचा कार्यक्रम थांबवणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader