RSS Chief Mohan Bhagwat Speech: विजयादशमीच्या निमित्ताने आज देशभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील १०० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याप्रीत्यर्थ नागपूरमध्ये संघ मुख्यालयातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार आज सकाळी मुख्यालयात स्वयंसेवकांचं पथसंचलन पार पडलं. त्यानंतर काही मान्यवरांच्या भाषणांनंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषण केलं. यावेळी मोहन भागवत यांनी हिंदू धर्म काय आहे? यासंदर्भात त्यांची भूमिका मांडली. तसेच, त्यानुसारच आपलं आचरण असायला हवं, असंही ते म्हणाले.

धर्म कसा अस्तित्वात आला?

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदू धर्माविषयी विचार मांडले. “स्व काय आहे? आपण कोण आहोत? कुठून आलो? कुठे जायचंय? या आधारावर आपल्या पूर्वजांनी एक सत्य प्राप्त केलं. त्या सत्याच्या आधारावर आपली काही मूल्य तयार झाली. ज्याला धर्म म्हणतात. सत्य, करुणा, शुचिता, तपस या चौकटीत जो बसतो, तो धर्म आहे. धर्म भारताचा स्व आहे. प्रचलित धर्म नाही. असे धर्म अनेक आहेत. सर्व धर्मांच्या मागे जो धर्म आहे, त्यामागची जी अध्यात्मिकता आहे, सर्व धर्मांच्या वरचा जो धर्म आहे, तो धर्म भारताचा प्राण आहे. ती आपली प्रेरणा आहे. त्यातून आपल्या इतिहासाची जडणघडण झाली आहे. त्यासाठी आपले बलिदान झाले आहेत”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

“हिंदू धर्म हा वास्तवात मानवधर्म, विश्वधर्म आहे”

“आपला इतिहास बघा. तुम्हाला कळेल की भारतात जे कर्तृत्व घडलंय, जो संघर्ष झालाय तो धर्मासाठी झालाय. त्या धर्माचं स्पष्ट स्वरूप आपल्याला लक्षात यायला हवं. आपण कोण आहोत? आपण म्हणत असतो की आपण सगळे हिंदू आहोत. पण जो शाश्वत आहे, जो सनातन आहे, जो सृष्टीसोबतच अस्तित्वात आलाय, जो सगळ्यांना आहे, जो सगळ्यांचा आहे, आपण त्याचा शोध लावलेला नाही. आपण कुणाला तो दिलेला नाही. आपण त्याला फक्त ओळखलं आहे. त्यामुळेच त्याला हिंदू धर्म म्हणतात. जो वास्तवात मानवधर्म, विश्वधर्म आहे. तो आपला स्वत्व आहे. त्याच्या आधारावर चालणं, छोटे-छोटे व्यवहारदेखील त्याच्या आधारावर होतात. त्याच्या गौरवातून स्वाभिमान उत्पन्न होतो. स्वाभिमान आपल्याला पुढे जाण्याचं सामर्थ्य देतो”, असंही त्यांनी नमूद केलं.

OTT प्लॅटफॉर्म्सवर सरसंघचालक मोहन भागवतांचा तीव्र आक्षेप; म्हणाले, “जे सांगणंही अभद्र ठरेल इतकं बीभत्स…”

“जे आपल्या देशात बनू शकतं, ते बाहेरून आणायचं नाही. बाहेरून आणायचंच असेल, तर ठीक आहे. मग आणा. आंतरराष्ट्रीय व्यापारात देवाण-घेवाण करावीच लागते. पण तिथे आपल्या आवश्यकतांनुसार आपण व्यवहार करायला हवा. आपल्या घरात आपण आपली भाषा बोलायला हवी. आपल्या देशातली आध्यात्मिक ठिकाणंही पाहा. प्रेरणात्मक ठिकाणं पाहा. किल्ले पाहा. चित्तौडगड पाहा. रायगड बघा. हा स्वदेशीचा व्यवहार आहे. त्याचं आग्रहपूर्वक पालन करायला हवं”, असं म्हणताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वदेशी बाबींचं महत्त्व ओळखण्याचं आवाहन केलं.