RSS Chief Mohan Bhagwat Nagpur Speech: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज शंभर वर्षं पूर्ण होत असून यानिमित्ताने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने नागपूरमध्ये संघ मुख्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी सरसंघचालक मोहन भागवत यांचं मुख्यालयात भाषण झालं. यावेळी मोहन भागवत यांनी भारताची वाटचाल व जागतिक स्तरावरील आव्हानं याबाबत भाष्य केलं. त्याचवेळी, त्यांनी हिंदू समाजाला संघटित राहण्याचं आवाहन केलं. यावेळी बांगलादेशमधील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. भारताला रोखण्याचा प्रयत्न काही देश करत असल्याचं ते म्हणाले.

“एका आव्हानाचा विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. कारण ते आव्हान फक्त संघ किंवा हिंदू समाजासमोर नाहीये. फक्त भारतासमोरही हे आव्हान नाही. जगभरात हे आव्हान निर्माण होत आहे. ते आपण समजून घ्यायला हवं. भारत पुढे जाऊ नये, अशी इच्छाही अनेक देशांची आहे. त्यांचा विरोध होईल अशीच अपेक्षा आहे. ते वेगवेगळ्या प्रकारच्या चाली खेळतीलच. तसं होतही आहे. आजतागायत भारत सोडून इतर कोणत्या देशानं जगाच्या विकासाचा मार्ग निवडलेला नाही. आपण ते करतो”, असं ते म्हणाले.

बांगलादेशमध्ये काय घडलं?

“इतर देशांमध्ये विध्वंस घडवून आणणं, तिथली सरकारं पाडणं या गोष्टी जगात घडत असतात. आपल्या शेजारी बांगलादेशात काय घडलं? त्याची काही तात्कालिक कारणं असतीलही. पण एवढा मोठा विद्ध्वंस तेवढ्यानं होत नाही. दोन गोष्टी स्पष्ट आहेत. त्या विद्ध्वंसामुळे हिंदू समाजावर अत्याचाराच्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली. कुठे काही गडबड झाली की दुर्बलांवर आपला राग काढण्याची कट्टरपंथी वृत्ती आहे. ही वृत्ती जोपर्यंत तिथे आहे, तोपर्यंत हिंदूच नव्हे, सर्वच अल्पसंख्यकांच्या डोक्यावर ही तलवार टांगती राहणार आहे”, असं मोहन भागवत यावेळी म्हणाले.

याशिवाय बांगलादेशमधील परिस्थितीचा उल्लेख करत ते म्हणाले,”त्यांना आपल्या मदतीची, जगभरातल्या हिंदूंच्या मदतीची गरज आहे. हे हिंदूंच्या लक्षात यायला हवं की दुर्बल राहणं अपराध आहे. आपण दुर्बल, असंघटित आहोत याचा अर्थ आपण अत्याचाराला निमंत्रण देत आहोत. मग त्यासाठी कोणत्याही कारणाची गरज नाही. आपण दुर्बल आहोत हेच निमित्त आहे. त्यामुळे जिथे आहात, तिथे संघटित राहा. कुणाशी शत्रुत्व करू नका. हिंसा करू नका. पण याचा अर्थ दुर्बल राहणं नाही. हे आपल्याला करावंच लागेल”, असं आवाहन सरसंघचालकांनी आपल्या भाषणात केलं.

RSS Centenary Years Live : कोलकाता बलात्कार प्रकरणावर सरसंघचालकांचे मोठे विधान, म्हणाले ” राजकीय संरक्षणामुळे… “

बांगलादेश-पाकिस्तानची भारताविरुद्ध हातमिळवणी?

दरम्यान, यावेळी बांगलादेश व पाकिस्तान यांची भारताविरुद्ध हातमिळवणी झाल्याचं सरसंघचालक म्हणाले, “दुसऱ्या एका गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं. तिथे बांगलादेशात चर्चा असते की भारतापासून आपल्याला धोका आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. त्यामुळे पाकिस्तानला सोबत घ्यायला हवं. दोघं मिळून आपण भारताला रोखू शकतो असं त्यांना वाटतं. ज्या बांग्लादेश निर्मितीमध्ये भारताचं सहकार्य राहिलं, ज्या बांगलादेशबाबत आपण कधीही वैरभाव ठेवला नाही तिथे या चर्चा होत आहेत. या चर्चा कोण करतंय? अशा चर्चा तिथे व्हाव्यात हे कोणकोणत्या देशांच्या हिताचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आपल्या देशातही हे असं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. भारत सामर्थ्यशाली होऊ नये असे प्रयत्न चालू आहेत”, असं मोहन भागवत म्हणाले.