लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून ३२ जागा दूर राहिलेल्या भाजपाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आले आहे. ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख लिहिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यामुळे हवेत गेलेल्या भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी लोकसभा निवडणुकीचा निकाल त्यांना वास्तवाची जाण करून देणारा ठरला आहे. मोदींच्या लोकप्रियतेमुळे तळातील सामान्यांचा आवाज न ऐकणाऱ्या भाजपाला ही एक चपराक असल्याचे ऑर्गनायझर लेखात म्हटले आहे.

लोकसभेचा निकाल लागून आठवड्याभराचा कालावधी होत नाही तेवढ्यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य रतन शारदा यांनी “मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन” या ऑर्गनायझरच्या लेखातून भाजपावर टीकेची झोड उठविली आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही निकालानंतर टीकात्मक भाष्य केले होते. खरे संघसेवक अंहकारी नसतात आणि निवडणुकीची प्रतिष्ठा राखली गेली नाही, ही त्यांची विधाने बरीच चर्चेत राहिली.

“संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

अजित पवारांना घेऊन चूक केली

राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर अनेक पुस्तके लिहिलेल्या रतन शारदा यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाला नको असलेले राजकारण कारणीभूत असल्याचे म्हटले. यासाठी त्यांनी महाराष्ट्राचे उदाहरण दिले. “महाराष्ट्रात काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचे बहुमत असतानाही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले गेले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली, अशी टीका रतन शारदा यांनी केली.

रतना शारदा यांनी आपल्या लेखात पुढे म्हटले की, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सदस्य हे भाजपाचे मैदानावर काम करणारे कार्यकर्ते नाहीत. स्वंयसेवकांची मदत मागण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते कुठेतरी कमी पडले.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाशी संबंधित महिला, दलित किंवा ओबीसी नेत्याची वर्णी?

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीचे पहिले दोन टप्पे झाल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका मुलाखतीत राष्ट्रीय स्वंयसवेक संघावर केलेले भाष्य वादाचा विषय ठरले होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा पक्ष आणि आताचा भाजपा पक्ष यात बराच फरक असल्याचे ते म्हणाले होते. भाजपा आता मजूबत पक्ष बनला असून आम्हाला संघाच्या मदतीची गरज उरली नसल्याचे ते म्हणाले होते.

रतन शारदा यांनी ऑर्गनायझरच्या लेखात कुणाचेही नाव न घेता भाजपा नेत्यांच्या अतिआत्मविश्वासावर टीका केली आहे. “लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल भाजपा कार्यकर्ता आणि नेत्यांना वास्तवाचे भान आणून देण्यास पुरेसे आहेत. भाजपा नेत्यांना हे कळले नाही की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४०० पार ची दिलेली घोषणा हे त्यांचे ध्येय आहे. विरोधकांचे नाही.