Sandipan Bhumre : छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर असताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर सडकून टीका केली होती. शिवसेनेशी गद्दारी केल्यानंतर काही लोक डिफेंडर गाडी आणि वाईनची दुकानं लावून फिरत आहेत, असे ते म्हणाले होते. या टीकेला आता खासदार संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संदीपान भुमरे यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यानच त्यांना आदित्य ठाकरे यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना आदित्य ठाकरे यांच्या श्वानाला फिरायलाही डिफेंडर गाडी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!

नेमकं काय म्हणाले संदीपान भुमरे?

“आज चारचाकी गाड्या कोणाकडे नाही? आता सगळे जण गाड्यांमध्ये फिरतात. आदित्य ठाकरे तरी कुठं साध्या गाडीत फिरतात, ते सुद्धा लक्झरी गाडीतच फिरतात ना? की त्यांच्याकडे इंडीका गाडी आहे? गरीब माणसाने काय डिफेंडर गाडीत फिरू नये का?” असं संदीपान भुमरे म्हणाले.

“आदित्य ठाकरेंच्या श्वानाला फिरायला डिफेंडर गाडी”

पुढे बोलताना, “आज गरीब शेतकऱ्याच्या मुलासुद्धा गाडीत फिरण्याचा अधिकार आहे. आदित्य ठाकरे दुसऱ्यांच्या गाडीबाबत बोलताना पण त्यांच्या कुत्र्याला फिरायला डिफेंडर गाडी आहे? मग आम्ही गाडीत का फिरायचं नाही?” अशी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – Sambhaji Nagar Clashes : छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा! भाजपा अन् ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करत भाजपाची घोषणाबाजी!

आदित्य ठाकरेंनी नेमकी काय टीका केली होती?

दरम्यान, संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी खासदार संदीपान भुमरे आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. “जे लोक शिवसेनेशी गद्दारी करून निघून गेले, त्यांना नंतर बरंच काही मिळालं. काही लोक तर माझ्या व्यासपीठावरून पळून गेले होते. काही सुरतला गेले, काही गुवाहाटीला गेले, नंतर गोव्यात जाऊन टेबलांवर नाचले. शिवसेनेशी गद्दारी करून आज त्यांची थोड्याफार काळासाठी प्रगती झाली असेल कुणाला ७२व्या मजल्यावर घर मिळालं असेल, तर कुणाला डिफेंडर गाडी मिळाली असेल, कुणाला टोल नाके मिळाले असतील, तर कुणाला वाईनची दुकानं मिळाली असतील”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.