सांगली : सागरेश्‍वर अभयारण्यामध्ये १७१ चितळ, २२० सांबर बौध्द पौर्णिमेदिवशी करण्यात आलेल्या प्राणीगणनेत आढळून आल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून शुक्रवारी देण्यात आली. सागरेश्वर अभयारण्यामध्ये २२ मे रोजी बौध्द पौर्णिमेच्या रात्री आठ पाणवठ्यावर प्राणीगणना करण्यात आली. या प्राणीगणनेमध्ये वन विभागाचे १४ अधिकारी, कर्मचारी आणि आठ प्रगणकांनी आपला सहभाग नोंदवला होता.

वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बौध्द पौर्णिमेच्या दिवशी सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना कार्यक्रम घेतला जातो. प्राणीगणना कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमींना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळत असल्याने दरवर्षी प्राणीगणना कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांची पाठराखण केल्याने छगन भुजबळांना घरचा आहेर; हसन मुश्रीफ म्हणाले, “मनुस्मृतीचा विषय बाजूला पडेल…”

वन्यजीव विभागामार्फत राबविण्यात आलेल्या प्राणी गणना कार्यक्रमात मुंगूस- १, माकड- ७१, रानडुक्कर-२८, चितळ-१७१, ससा-४, सांबर-२२०, साळिंदर- ७, मोर- ११, कोल्हा- ५ आणि घोरपड- ५ या प्राण्यांचे प्राणीगणना प्रसंगी दर्शन झाल्याची माहिती कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस.एस.पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.