सांगली : जातीपातीचे राजकारण आणि जवळच्या लोकांनी केलेला विश्वासघात यामुळे लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. एका पराभवाने खचून जाणारा मी नाही. दोन महिन्यांत होणारी विधानसभा निवडणूक आपणास जिंकायची आहे, असे सांगत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणुकीसाठी तयारी असल्याचे जाहीर केले. मात्र, उमेदवार स्वत: की मुलगा यावर त्यांनी भाष्य टाळले.

तासगावमधील दत्त माळावर प्रभोदय मंडळाच्यावतीने शुक्रवारी दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. तासगाव तालुक्यातील गोविंदा पथके अन्य जिल्ह्यात जाऊन लाखो रुपयांची बक्षिसे मिळवत आहेत. या मुलांचे कौतुक करावे यासाठीच हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे, असे पाटील म्हणाले.

हेही वाचा – Mahyuti Disruption : “राष्ट्रवादीला युतीत घेतल्यामुळे भाजपाचं वाटोळं झालं”, भाजपा नेत्याचं वक्तव्य; महायुतीत धुसफूस चालूच

जिल्ह्यातील जनतेने आजपर्यंत मला सहकार्य केले आहे. लोकांची शक्ती, आशीर्वाद या बळाच्या जोरावर मी दोन वेळा खासदार झालो. मात्र, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विकासापेक्षा जातीपातीचे राजकारण झाले. त्यामुळे आपणास अडचणी निर्माण झाल्या. आपण ज्यांना मदत केली त्यांनी या निवडणुकीत आपल्या सोबत विश्वासघात केला. मात्र, दोन महिन्यांत पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत आपण आपली शक्ती, ताकद दाखवून द्यायची आहे. विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, असे संजयकाका पाटील म्हणाले.

हेही वाचा – Carrying Beef In Nashik Train: नाशिक: गोमांस बाळगल्याच्या संशयावरून ट्रेनमध्ये तरुणांची वृद्धाला मारहाण; गुन्हा दाखल

उद्याच्या काळात पुन्हा ताकदीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची आहे. जिंकायची आहे. त्यामुळे दोन महिने ताकदीने काम करूया. विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया. गतिमान विकास करूया. काहींना केवळ मोठे बोलण्याची सवय आहे. हातभर लाकूड आणि दहा हात ढलपी असं सुरू आहे, अशी टीका संजयकाका पाटील यांनी आर. आर. आबा गटावर केली.