सांगली : ‘काट्याच्या आणीवर वसली तीन गावं, दोन ओसाड, एक वसेचना’ अशी संत एकनाथ यांच्या भारूडातील गावाप्रमाणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींची अवस्था सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांसाठी छाननीनंतर १८४ उमेदवार उरले असून, यापैकी एकाही राजकीय पक्षाने महिलांना संधी तर दिलीच नाही. मात्र, अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या १० महिलांनाही रणांगणातून बाजूला करण्याचे हस्ते, परहस्ते प्रयत्न सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना डावलण्यात आल्याने त्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली आहे. सांगलीत त्यांच्या नामसाधर्म्यांचा लाभ उठविण्याच्या हेतूने आणखी तीन महिला उमेदवार जयश्री पाटील या नावाच्या आहेत.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!

सांगली मतदारसंघामध्ये जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील, जयश्री (वहिनी) जगन्नाथ पाटील, जयश्रीताई पाटील आणि मिनाक्षी विलास शेवाळे या चार महिला आणि बहुजन समाज पार्टीने अधिकृत उमेदवार दिलेल्या आरती सर्जेराव कांबळे या पाच महिला उमेदवार आहेत. आता उमेदवारी माघारीच्या मुदतीपर्यंत कोण मैदानात राहते हे सोमवारी स्पष्ट होणार आहे.

मिरज मतदारसंघातून चार महिला रिंगणात उतरल्या आहेत. यामध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या पत्नी सुमनताई खाडे यांच्यासह जैनब पिरजादे, ज्योती कांबळे, स्टेला गायकवाड यांचा समावेश आहे. तर पलूस मतदारसंघामध्ये शंकुतला शशिकांत पवार या एकमेव महिला उमेदवार आहेत. अन्य पाच विधानसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नाही.

हेही वाचा – Eknath Shinde : माहीममध्ये महायुतीचा पाठिंबा कोणाला? सदा सरवणकरांना समर्थन की मनसेला साथ? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

एकाही राजकीय पक्षाकडून महिलांना उमेदवारी न देता एकमेव मातब्बर उमेदवार म्हणून मैदानात उतरलेल्या सांगलीतील जयश्री पाटील यांची उमेदवारी मागे कशी घेतली जाईल, याचीच मोर्चेबांधणी मात्र सध्या काँग्रेसकडून सुरू आहे. अद्याप त्यांची अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका असली तरी सोमवारनंतरच खरे काय ते स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात यापूर्वी कळंत्रे अक्का (१९५२), लोकसाहित्याच्या अभ्यासिका सरोजिनी बाबर (१९५२), शालिनीताई पाटील (१९८०) आणि सुमनताई आरआरआबा पाटील (२०१४) व (२०१९) या महिलांनी विधीमंडळात प्रतिनिधित्व केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangli miraj women representative assembly election 2024 ssb