सांंगली : देशात सुबत्ता निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, तंत्रज्ञानाची नक्कल न करता आपण आपले तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज आहे. जगात आपण भारी ठरू शकतो. मात्र, यासाठी गरीब-श्रीमंत ही विषमता नष्ट केली पाहिजे, असे मत पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी सांगलीत बोलताना व्यक्त केले.

कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था व कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित कर्मवीरभूषण वितरण सोहळा त्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम होते. या वेळी डॉ. अजित पाटणकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या सामाजिक व आर्थिक कार्याची माहिती दिली.

हेही वाचा – Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची समरजिसिंह घाटगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “अशा लोकांच्या…”

डॉ. काकोडकर म्हणाले, की भारत तरुणांचा देश आहे. तरुणांत मोठी प्रतिभा आहे. मात्र, त्यांना वाव मिळाला पाहिजे. आपण नजीकच्या काळात महासत्ता बनू शकतो. मात्र, गरीब-श्रीमंत ही विषमताही नष्ट करण्याची गरज आहे. शेतात घरी बसून आपला तरुण उत्पादन करू शकेल व व्यवसाय मिळवू शकेल. वर्क फ्रॉम होत असेल, तर वर्क फ्रॉम व्हिलेजसुद्धा होऊ शकते. आपल्या तरुणांनी शहराकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपल्याकडे खूप संसाधने असल्यामुळे शहरातील माणसे खेड्याकडे येतील. त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल.

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

या वेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना कर्मवीर कृषिभूषण, प्रा. डॉ. डी. डी. चौगुले यांना कर्मवीर विद्याभूषण व उद्योजक योगेश लक्ष्मण राजहंस यांना कर्मवीर उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मूकबधिर मुलांच्या शाळेस रु. एक लाखाच्या मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.