सांगली : ग्रामीण प्रमाणे महिला, ज्येष्ठ व वयोवृध्द नागरिकांना सांगली व रत्नागिरी मधील शहरी बसच्या प्रवाशी भाड्यात सवलत लागू होणार आहे.याबाबतचा शासन आदेश शनिवारी जारी झाला असून ही सवलत रविवारपासून (उद्या) लागू होणार आहे. शहरी बस वाहतुकीसाठी ज्येष्ठ नागरिक व महिलांना ५० टक्के तर ७५ वर्षावरील वृध्द प्रवाशांना शंभरटक्के सवलत योजना लागू होणार आहे. यापुर्वी या सवलतीमधून शहरी बस सेवा वगळण्यात आली होती.

राज्यातील एसटी महामंडळापुढे खासगी बसच्या प्रवासी वाहतुकीचे मोठे आव्हान असल्याने एसटी महामंडळ आर्थिक संकटात सापडले होते.यातून एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी महिलांसाठी ५० टक्के आणि ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के प्रवासी भाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यामुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ झाली होती. मात्र, हा निर्णय केवळ ग्रामीण व लांबपल्ल्याच्या बस प्रवासासाठी होता.

हेही वाचा : उद्धव ठाकरेंशी झालेल्या भेटीनंतर निलेश लंकेंनी केला निर्धार; म्हणाले, “नगर जिल्ह्यात…”

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या सांगलीतील ४० आणि रत्नागिरीमधील १० बसमध्ये ग्रामीण भागाप्रमाणे प्रवासी सवलत योजना लागू करण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनाने शनिवारी जाहीर केला. यानुसार शहरी बससेवेसाठी महिलांना ५० टक्के, ६५ ते ७५ वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के आणि ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत सांगलीचे विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, शहरी बस सेवा वेगवेगळ्या मार्गावर धावत असून यापुर्वी याच मार्गावरून धावत असलेल्या ग्रामीण भागात ही सवलत उपलब्ध नव्हती. मात्र, उद्या रविवारपासून ही सवलत शहरी बस वाहतूक होत असलेल्या सर्व मार्गावरील प्रवाशांना लागू होणार आहे. सध्या सांगली व मिरज आगारातील शहरी बस सेवेचे उत्पन्न सव्वा ते दीड लाख रूपये आहे. या सवलत योजनेमुळे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : “छगन भुजबळ दंगल घडवणार”, मनोज जरांगेंकडून चिंता व्यक्त; म्हणाले, “ते सरकारमध्ये बसून…”

दरम्यान, शहरी बस सेवेत महिला, ज्येष्ठ नागरिक यांना सवलत योजना लागू झाल्यानंतर खासगी प्रवासी वाहतूक करणारे रिक्षाचालकांवर संक्रांत येणार आहे. वडापच्या नावाने बसथांब्यावरून अनेकदा प्रवासी वाहतूक केली जात असून याचा परिणाम शहरी बससेवेच्या उत्पन्नावर झाला आहे. बस वाहतूक तोट्यात असल्याने शहरानजीक असलेल्या शहरी बस वाहतूकीच्या फेर्‍याही कमी करण्यात आल्या आहेत.