सांगली : चार शतकांचा साक्षीदार असलेल्या भोसेतील वटवृक्षाच्या फांद्या जिल्ह्यातील ७०० गावात लावून ऐतिहासिक वडाच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला. राष्ट्रीय महामार्गाची दिशाही बदलण्यास भाग पडलेल्या या वटवृक्षाचे दोन दिवसांपूर्वी सततच्या पावसाने पतन झाले.
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गामध्ये येत असल्याने या वडाच्या झाडाच्य पतनाचे संकट उभे ठाकले होते. त्यावेळी पर्यावरण रक्षणासाठी काम करत असलेल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना हा वटवृक्ष वाचविण्याची विनंती केली असता राष्ट्रीय महामार्गाचे आरेखन बदलून हे झाड वाचविले होते. मात्र, सोमवारी सततच्या पावसाने आणि महामार्गाच्या कामामुळे झाडांची मुळे सैल झाल्याकारणाने ५०० मीटर परिसर व्यापणारा महाकाय वड उन्मळून पडला. याची दखल जिल्हा परिषदेने घेतली.
हेही वाचा – कोल्हापुरात आढळला दुर्मिळ स्पॉटेड वूल्फ स्नेक
मंगळवारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी अविशाश पाटील, ग्रामविस्तार अधिकारी विनायक मोरे, गावचे सरपंच पारिसनाथ चौगुले,अमोल गणेशवाडे, वृक्षप्रेमी प्रवीण शिंदे यांनी भेट देऊन पुनर्रोपण करता येईल का याची पाहणी केली. या वृक्षाचा बुंधा आहे त्याच ठिकाणी जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर महाकाय वडाच्या फांद्या काढून जिल्ह्यातील ७०० गावामध्ये ग्रामपंचायतीच्यावतीने रोपण करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.