सांगली : ‘नाथबाबांचं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीत खरसुंडी (ता. आटपाडी) येथील सिद्धनाथांच्या चैत्री यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असणाऱ्या खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक खरसुंडीत दाखल झाले होते. चार दिवस चैत्री यात्रेचे विधी पार पडल्यावर सासनकाठी व पालखी सोहळा उत्साहात साजरा झाला.
चैत्र वद्य दशमीला देवाची लोखंडी सासन धावडवाडीचे मुस्लिम व विठलापूरचे बाड यांनी स्नानासाठी घोडेखूर येथे नेली. त्यानंतर ती जोगेश्वरी मंदिरात परत आणली. आज सकाळी सासनकाठी व पालखीने मिरवणुकीच्या सोहळ्यास सुरुवात झाली.
गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होऊ लागल्या. मंदिराच्या आवारात सासनकाठ्या आल्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवण्यात येत होत्या. दर्शनासाठी आलेले भाविक सासनकाठीवर गुलाल व खोबऱ्याची मुक्त उधळण करीत होते.दुपारी एक वाजता नाथ निमंत्रक नयाबा गायकवाड यांचे वंशज प्रथम मानकरी गायकवाड बंधू यांना पुजारी बांधव मंदिरात घेऊन येतात, नंतर आटपाडीचे मानकरी देशमुख यांना घेऊन येण्यासाठी पुजारी व गायकवाड त्यांना मंदिरात घेऊन आले. त्यानंतर पालखी सोहळ्यास सुरुवात झाली.
अग्रभागी मंदिरातील पुजारी धूपारती, सेवेकरी, मानकरी, भालदार, चोपदार अशा पारंपरिक व शाही थाटाच्या लवाजम्याने पालखीसह प्रस्थान केले. नगारखाना प्रवेशद्वारातून पालखी तीन वाजता मुख्य पेठेत दाखल झाल्यावर भाविकांनी ‘चांगभलं’च्या गजरात गुलाल-खोबऱ्याची एकच उधळण केली.या वेळी मुख्य पेठेसह संपूर्ण आसमंत गुलाबी दिसत होता. मुख्य पेठेतून गुलाल-खोबऱ्याची उधळण झेलत पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात पोहोचला. तत्पूर्वी महादेव मंदिराच्या प्रांगणात सर्व सासनकाठ्या पालखीला टेकवून सलामी देण्यात आली. जोगेश्वरी मंदिरात पानसुपारी झाल्यानंतर प्रथेप्रमाणे टकऱ्या घडशी यांनी सासनकाठीला टक्कर दिली व पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला. या वेळी पालखीसोबत देवाच्या लोखंडी सासनकाठ्या होत्या.
‘चांगभलं’च्या गजरात पालखी मुख्य मंदिरात पोहोचल्यानंतर श्रीफळ वाढवण्यास सुरुवात झाली. यात्रा शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी देवस्थान समिती, ग्रामपंचायत, बाजार समिती, महसूल व पोलीस प्रशासन, सेवेकरी व मानकरी यांनी परिश्रम घेतले.